पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या तीर्थक्षेत्रासाठी निधी द्या- …या नेत्यांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा येथील गोदावरी नदीकाठावरील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी तातडीने निधी देण्याची मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्री क्षेत्र पुणतांबा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठावर वसलेले एक अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन धार्मिक स्थळ आहे.या गावात महान योगी संत चांगदेव महाराजांची संजीवन समाधी आणि त्यांचे भव्य मंदिर यामुळे ओळखले जाते.येथे सुमारे चारशेहून अधिक वर्षांपूर्वींची अनेक पुरातन मंदिरे आहेत.त्यांचा जीर्णोद्धार होणे गरजेचे असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगावच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची पुणतांबा वारी केल्यानंतर आज आ.आशुतोष काळे यांनी या प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की,”पुणतांबा हे तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असून गोदावरी नदीकाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला अहिल्या घाट हा या परिसराच्या वैभवाचा आणि अस्मितेचा ऐतिहासिक ठेवा आहे.हा घाट प्राचीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जात असून या घाटावर २६ दगडी पायऱ्या,आकर्षक गोलाकार बुरूज,प्राचीन महादेव मंदिर,कार्तिकस्वामी मंदिर आणि संत चांगदेव महाराज समाधी परिसर यांसारखी महत्त्वाची धार्मिक व पवित्र स्थळे आहेत.या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशामुळे तसेच वर्षभरात अनेक विविध धार्मिक कार्यक्रम होत असल्याने राज्यभरातून हजारो भाविक,अभ्यासक आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत असतात.
दरम्यान काळाच्या ओघात आणि योग्य देखभालीअभावी सध्या या ऐतिहासिक घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.घाटाचे जुने दगडी बांधकाम आता झिजत चालले असून अनेक ठिकाणी भिंतींना व पायऱ्यांना मोठे तडे गेले आहेत.घाटावर येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या संरक्षण भिंत आणि कठड्यांचा येथे मोठा अभाव जाणवतो आहे.याशिवाय घाटाच्या परिसरात स्वच्छता,रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, ऐतिहासिक माहिती देणारे फलक आणि एकूणच सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीशी आणि लोककल्याणाच्या कार्याशी निगडित असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे मूळ वैभव टिकवणे आणि तिचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.
गोदावरी नदी काठावरील या ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर घाटाचा कायापालट करण्यासाठी,इतिहास संवर्धनासाठी आणि भाविकांसह पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्याची मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली असून त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.



