धार्मिक
…या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजित श्री क्षेत्र माहेगाव देशमुख (साकुरी) ते श्री क्षेत्र पंढरपूर या आषाढी पायी दिंडीचे शुक्रवार दि.१० जुलै रोजी माजी आ.अशोक काळे यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात विठोबा-रुखुमाईच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते तशी ती अलीकडील काळात माहेगाव देशमुख येथूनही होत आहे.
“पंढरपूरची वारी हा केवळ एक धार्मिक प्रवास नसून,महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि भक्ती,समानता,व समर्पणाचा एक अद्वितीय आध्यात्मिक उत्सव आहे.यामध्ये लाखो वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून अनेक दिवस पायी चालत, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा गजर करत पंढरपूरला पोहोचतात.त्याला कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ यांची दिंडी अपवाद नाही.त्यांनीही आज प्रस्थान केले आहे.
यावेळी बोलताना माजी आ.अशोक काळे म्हणाले, ‘आषाढी वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या संत परंपरेचा,भक्तीचा,समतेचा आणि सामाजिक ऐक्याचा महान उत्सव आहे.वारकरी संप्रदायाने अनेक शतकांपासून समाजाला प्रेम,बंधुभाव,संयम आणि सेवाभावाची शिकवण दिली आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात वारीची परंपरा माणसाला अध्यात्माशी जोडण्याचे आणि समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे.
माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी ही परंपरा जपण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.सर्व वारकऱ्यांची वारी सुखरूप, मंगलमय आणि निर्विघ्न पार पडो,तसेच पांडुरंगाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी आणि समाधान लाभो व भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
या प्रसंगी श्री अमृतेश्वर भजनी मंडळ,वारकरी तसेच माहेगाव देशमुख परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.भक्तिमय वातावरणात विठोबा रखुमाई च्या जयघोषात पायी दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.



