साहित्य व संस्कृती
“जो समाज जात,धर्माच्या फेऱ्यात अडकतो तो अप्रगतशील राहतो”-अर्थतज्ञ मुणगेकर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“ज्या देशात दारिद्र्य,बेरोजगारी,बकालपणा,शेतकरी आत्महत्या व अल्पसंख्यांकांचे सुरक्षेचे प्रश्न असून देखील तेथे केवळ जात आणि धर्माच्या फेऱ्यात समाज अडकलेला राहतो असा समाज कधीही प्रगती करू शकत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ,राज्यसभेचे माजी सदस्य व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.भालचंद्र मुणगेकर यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“माजी आ.के.बी.रोहमारे व त्यांचे चिरंजीव अशोक रोहमारे हे या पुरस्कार योजनेच्या माध्यमातून तसेच उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजाची खूप मोठी सेवा करीत असून त्यांचे कार्य दखलपात्र आहे”-सुमतीताई लांडे,जेष्ठ कवियत्री,श्रीरामपूर.
कोपरगाव येथील तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयात माजी आ.के.बी.रोहमारे पुण्यस्मरण व भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे होते.
सदर प्रसंगी शब्दालय प्रकाशनाच्या संचालक ज्येष्ठ कवयित्री सुमतीताई लांडे,डॉ.जीभाऊ मोरे,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,भि.ग.रोहमारे ट्रस्टचे सचिव रमेश रोहमारे,संस्थेचे विश्वस्त जवाहर शहा,संदीप रोहमारे,ऍड.राहुल रोहमारे,प्रा.डॉ.विजय ठाणगे,शोभाताई रोहमारे,मंदाताई रोहमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समाजाची उंची मोजण्याचा एकमेव मानदंड म्हणजे स्त्रियांचा सन्मान होय.साहित्य हे समाजाची धारणा,दशा आणि समाजाला उन्नत करणारे मौल्यवान साधन होय.मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याबरोबरच दलित साहित्य देखील उदयास आले.या साहित्य प्रवाहांनी ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी आणि दीन-दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य दिले अशा साहित्याचा आणि त्यातील मूल्यांचा आपण प्रबळ समर्थक आहे,स्रि वादाचे समर्थन करताना ते म्हणाले की,”आपण जन्मापासून स्त्रीवादी आहे.आज येथे ज्यांना ग्रामीण साहित्य पुरस्कार दिले गेले,त्यांच्या साहित्यातून स्त्रियांच्या वेदना,त्यांची दमकोंडी आणि त्यांचे प्रश्न अतिशय यथार्थपणे मांडले गेलेले आहेत.त्यामुळे हे सर्व साहित्यिक खऱ्या अर्थाने सन्मानाचे पात्र आहेत.कै.के.बी.रोहमारे,त्यांचा भि.ग.रोहमारे ट्रस्ट व त्यांचे के.जे.सोमैया महाविद्यालय हे आदर्श काम करणाऱ्या संस्था आहेत.त्यांच्या आदर्शाचे वर्णन या साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून पुढे आणावे.राजकारण एक अत्यंत आदर्श कला आहे.संसदीय लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष अनिवार्य आहे.कारण त्यांच्या शिवाय लोकशाही चालणार नाही नसल्याचे शेवटी म्हटले आहे.
“ग्रामीण भागातील शेतकरी जीवन जगणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या व्यथांची मांडणी करता करता मला कविता सुचली.मातीची संस्कृती ही आमची खरी संस्कृती.त्यामुळे मातीत रुजणे हे आमच्यासाठी अधिक मोलाचे आहे.माझी ‘कुणब्याची कविता’ विद्यापीठ अभ्यासक्रमात लागल्यानंतर माझ्या कवितेचे सोने झाले”-लक्ष्मण महाडिक,पुरस्कार प्राप्त कवी.
सदर प्रसंगी कादंबरीकार उत्तम बावस्कर,पुरस्कार प्राप्त कवी डॉ.सुभाष वाघमारे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.याशिवाय परीक्षकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांनी मांडल्या आहेत.
सदर प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले आहे.दरम्यान यावर्षी उत्तम बावस्कर यांना काळबाटा या उत्कृष्ट ग्रामीण कादंबरीसाठी,ज्योती सोनवणे यांना दमकोंडी या उत्कृष्ट ग्रामीण कथासंग्रहासाठी,लक्ष्मण महाडिक यांना स्त्री-पुरुषाच्या कविता व डॉ.सुभाष वाघमारे यांना संविधानाच्या स्वप्नातलं गाव या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून तर जी.ए.उगले व डॉ.रामकिशन दहिफळे यांना उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून भि.ग.रोहमारे साहित्य पुरस्काराचे प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप रुपये १५ हजार रोख,प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे होते.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.विजय ठाणगे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यवाह डॉ.गणेश देशमुख,रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे,सहकार्यवाह डॉ.संजय दवंगे,प्रा.डॉ.के.एल.गिरमकर,प्रा.डॉ.एस.एल.अरगडे,डॉ.वसुदेव साळुंके आदींनी विशेष परिश्रम घेतले शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे विश्वस्त ऍड.राहुल रोहमारे यांनी मानले आहे.