जलसंपदा विभाग
रेल्वेसह नदी जोड प्रकल्पासाठी…या खासदारांची राज्यपालांची भेट!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांची राजभवन येथे भेट घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनहिताच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली असून त्यात उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ववत पूर्वनियोजित अकोले-संगमनेर मार्गेच राबवणेसह महाराष्ट्राच्या भविष्यासाठी जीवनदायी ठरणारा नदी जोड प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा,अशी मागणी शिर्डीचे खा.वाकचौरे यांनी केली आहे.त्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणे,आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देणे, पुणे-नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग पूर्ववत करणे आणि नदी जोड प्रकल्प मार्गी लावणे ही आमची सर्वोच्च प्राधान्याची भूमिका आहे.या सर्व प्रश्नांच्या समाधानासाठी केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक स्तरावर सातत्याने आणि प्रभावीपणे पाठपुरावा सुरू राहील”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
नाशिक-पुणे जलदगती रेल्वे मार्गाचा मूळ आराखडा रद्द करण्याच्या निर्णयामुळे नाशिक, पुणे,अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र रोष प्रगट होत आहे.या निर्णयाविरोधात सिन्नर,संगमनेर, अकोले,नारायणगाव, खेड आदी तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.तर काहींनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.या पार्श्वभूमीवर आज खा.वाकचौरे यांच्या राज्यपालांच्या भेटीला महत्व आले आहे.

“गोदावरी खोऱ्यासह तापीपासून कोकण खोऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी दिलासा देणारा आणि शेती,उद्योग,पिण्याचे पाणी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा सुमारे ४०० टी.एम.सी.चा गोदावरीसह अन्य नद्यांचा नदी जोड प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत,या प्रकल्पासाठीही राज्यपालांनी विशेष पुढाकार घ्यावा अशी विनंती राज्यपाल यांना करण्यात आली आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी.
यावेळी खा.वाकचौरे यांनी राज्यपालांना सांगितले की,”अकोले तालुक्यातील आदिवासी भाग आजही पायाभूत सुविधा,शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, सिंचन आणि रोजगाराच्या अनेक मूलभूत समस्यांशी झुंज देत आहे.संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असून,शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचला पाहिजे.यासाठी राज्यपालांनी विशेष लक्ष घालण्याची विनंती के आहे.

यावेळी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचाही मुद्दा मांडण्यात आला आहे.पूर्वनियोजित अकोले-संगमनेर मार्गासाठी भूसंपादनासह अनेक प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या असताना प्रस्तावित मार्गात बदल झाल्याने संपूर्ण उत्तर पुणे,अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षांना धक्का बसला असल्याचे खा. वाकचौरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे मूळ नियोजनानुसारच अकोले-संगमनेर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ववत करण्यासाठी राज्यपालांनी केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर आवश्यक समन्वय साधावा,अशी मागणी केली आहे.

दरम्यान गोदावरी खोऱ्यासह तापीपासून कोकण खोऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी दिलासा देणारा आणि शेती,उद्योग,पिण्याचे पाणी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा सुमारे ४०० टी.एम.सी.चा गोदावरीसह अन्य नद्यांचा नदी जोड प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत,या प्रकल्पासाठीही राज्यपालांनी विशेष पुढाकार घ्यावा,अशी विनंती करण्यात आली आहे.
या सर्व विषयांवर राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्याशी सकारात्मक,सखोल आणि परिणामकारक चर्चा झाली असल्याचा दावा केला आहे.राज्यपालांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विषयांवर महाराष्ट्र शासनाशी सकारात्मक चर्चा करून आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर सानप,दिपक दळवी आणि रोशन सानप आदी मान्यवर उपस्थित होते.



