आंदोलन
शहर रस्त्यांची कामे तातडीने सुरु करा-मागणी

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या रस्त्यांसाठी आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी देवून या कामांना मंजुरी देखील मिळालेली आहे.यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील संलग्न रस्त्यांचा समावेश असून अशा अनेक रस्त्यांची कामे तातडीने सुरु करावीत अशा आशयाचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाला देण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात वर्तमान लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते हजारो कोटी रुपयांची कामे केल्याचे दावे करत असताना दुसरीकडे तीच मंडळी विरोधकांसारखी निवेदने का देत आहे असा रास्त सवाल शहरातील नागरिकांना पडला आहे.त्यामुळे त्यांचा प्रशासणार वचक नाही असा त्याचा सरळ अर्थ होत असल्याचे शहरातील नागरिकांत बोलले जात आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहराच्या रखडलेल्या रस्ते विकासाला चालना देण्यासाठी आ.काळे यांनी अनेक रस्त्यांच्या कामांसाठी निधी दिला आहे.मात्र हि रस्त्यांची कामे सुरु होवू न शकल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी. यामध्ये कोपरगाव शहरातील धारणगाव रोड ते मार्केट यार्डला जोडणारा रोड (बैलबाजार रोड),गोदावरी पेट्रोल पंप ते समता स्कुल (टायनी टॉय) रोड (मार्केट रोड),आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह (धारणगाव रोड) ते मुंदडा घर रस्ता, समतानगर भागातील लोखंडे घर ते साईसिटी चर रस्ता,टाकळी नाका (निवारा कॉर्नर) ते माऊली ऍग्रो रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची कामे रखडल्यामुळे रस्त्यांचे काम कधी सुरु होणार व नागरिकांच्या अडचणी कधी दूर होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करावीत अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रविंद्र चौधरी यांनी हे निवेदन स्वीकारले असून लवकरात लवकर रस्त्यांच्या कामांना प्रारंभ केला जाईल असे आश्वासन उपस्थितांना त्यांनी दिले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,शहराध्यक्ष सुनिल गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ.तुषार गलांडे, राजेंद्र खैरनार,वाल्मिक लहिरे,धनंजय कहार,शैलेश साबळे,आकाश डागा,रहेमान कुरेशी,महेश उदावंत,अभिषेक मगर,संदीप सावतडकर,सोमेश आढाव,सागर जाधव,अनिरुद्ध काळे आदी उपस्थित होते.