आंदोलन
कोपरगाव तालुक्यातील…’ते’ आंदोलन अखेर स्थगित

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्यात गाजलेल्या कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणात उध्वस्त झालेल्या ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी व गायरान गट क्रमांक,४४७ व ४४८ मधील गावठाण विस्तारीकरण करावे या मागणीसाठी सुरु केलेले उपोषण आज तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी प्रस्ताव पाठविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर दुसऱ्या दिवशी सोडून दिले आहे.

“धोंडेवाडी येथील गावठाण विस्तारीकरणा बाबत मदत करण्यास आपण तयार आहे.मात्र यात कायदेशीर बाबीचा अभ्यास करून निर्णय घेणे गरजेचे असून त्यासाठी ग्रामस्थांना कायदेशीर सहकार्य सल्ला घेणे गरजेचे आहे”-संदीपकुमार भोसले,तहसीलदार,कोपरगाव.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण अठरा तर शिर्डी पासून पश्चिमेस पालखी रस्त्यावर १० कि.मी.अंतरावर जवळके ग्रामपंचायत हद्दी जवळच धोंडेवाडी हि ग्रामपंचायत सन-१९८० साली स्थापन झाली होती.त्यात दोन गटात काही वर्षापासून पाझर तलावातील विहिर बुजविण्यावरून वाद निर्माण झाले होते.त्यावरून हे प्रकरण तापून थेट गावठाण नजीक असलेल्या गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्यावर गेले होते.त्यात महसुली अधिकाऱ्यांनी गावठाण विस्तार योजनेत समाविष्ट करण्यासाठी नजीक सरकारी जमीन आहे का ? अशी विचारणा स्थानिक महसुली कर्मचाऱ्यांना सदर अतिक्रमण काढण्यापूर्वी केली होती.मात्र त्यांनी याबाबत अशी जमीन उपलब्ध असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना जमीन उपलब्ध नसल्याचे चुकीचे अहवाल दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अतिक्रमण पाडून टाकले होते.आता मात्र अशी जमीन ग्रामपंचायत हद्दीत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला होता.मात्र आज तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी आंदोलनस्थळी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन भेट दिली असता,”त्यांनी अशी राज्य सरकारची जमीन उपलब्ध असल्याचा दावा असत्य असल्याची माहिती दिली असून सदर जमीन केंद्राच्या वनीकरण विभागाची असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे तो मार्ग अत्यंत किचकट मानला जातो.त्यामुळे गावठाण विस्तारासाठी ज्या जागी अतिक्रमण जमीनदोस्त केले त्याच ठिकाणी ग्रामपंचायतीला केवळ आपल्या गावठाण विस्ताराची संधी शिल्लक राहिली असल्याचे समजते.मात्र त्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावण्या झाल्या असून त्या न्यायिक व शासन आदेशांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता ग्रामपंचायत आणि आंदोलनकर्ते आदींना केवळ गावठाण विस्तारीकरणासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावा लागणार आहे.व त्यासाठी नमुन्यात तो पाठवला तर हा विषय संपणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान धोंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढणे बाबत तहसीलदार भोसले यांचेशी आंदोलनकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली असून तो प्रश्न ऐरणीवर आला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान या प्रश्नी आंदोलनकर्ते नानासाहेब नेहे यांनी गावठाण विस्तारीकरण प्रस्ताव नमुन्यात पाठविण्याच्या कामास तहसीलदार भोसले हे सहकार्य करणार असल्याचे लेखी अभिवचन दिल्याने आपले आंदोलन मागे घेतले आहे.त्यावेळी तहसीदार भोसले यांनी आंदोलकर्ते नेहे यांना लिंबू पाणी देऊन आमरण उपोषण संपूष्टात आणले आहे.त्यामुळे आगामी काळात त्यांना जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.सदर प्रस्ताव छाननी करण्यासाठी तहसीलदार यांचेकडे येत असतो व त्या अहवालावर जिल्हाधिकारी कार्यवाही करत असल्याने ग्रामस्थांसह आंदोलनकर्ते यांना मोठी व रास्त अपेक्षा निर्माण झाली आहे.
सदर प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,धोंडेवाडीचे नूतन सरपंच राजेंद्र नेहे,माजी सरपंच ज्ञानदेव नेहे,बाळासाहेब काकडे,बाबासाहेब नेहे,अशोक नेहे,मंडलाधिकारी,तलाठी वडितके आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान याबाबत तहसीलदार संदीपकुमार भोसले यांचेशी संर्पक साधला असता त्यांनी,”गावठाण विस्तारीकरणा बाबत कायदेशीर बाबीचा अभ्यास करून निर्णय घेणे गरजेचे असून त्यासाठी आपण कायदेशीर सहकार्य करण्यास तयार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.