गुन्हे विषयक
…या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ,पोलिसांपुढे आव्हान !

न्युजसेवा
घारी (वार्ताहर )
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत आज दि.२० जून रोजी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी चार ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे.या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चोरट्यांना पकडण्याचे ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.

“एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे या गावातील आणि परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने या भागात रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा शोध घ्यावा”-योगीराज देशमुख,माजी सरपंच,देरडे-कोऱ्हाळे.
कोपरगाव तालुक्यात चोऱ्या आणि गुन्हेगारी कमी होण्याची काहीही चिन्हे दिसत नाही.शहराच्या भर पेठेत सचीन वॉच या दुकानात पहाटे मेच्या पहिल्या आठवड्यात चोरी घडली होती.टी चादर गँग ने केली असल्याचे सूतोवाच आमच्या प्रतिनिधीने सर्वप्रथम केले होते.ते खरे निघाले होते.त्यानंतर तिळवणी नजीक रस्ता लूट झाली होती.त्यानंतर देरर्डे चांदवड येथील एका खाजगी तार तंत्रीचा खून झाला होता.त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.त्याने तर पोलिसही चक्रावून गेले असून ही घटनेचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.मात्र तिळवणी येथील आरोपींना वा चोरट्यांना पकडण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना यश आले असून त्यांनी आरोपींना अटक करून मुद्देमाल पुन्हा फिर्यादी यांना परत केला आहे.त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत असताना आज त्यांना पुन्हा एकदा चोरट्यांनी आवाहन दिले आहे.
यातील पहिली घटना किशोर किराणा स्टोअर्स या दुकानात घडली आहे.चोरट्यांनी दुकानाचे शटर कटरच्या सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश केला आणि सुमारे दोन हजार रुपयांची चिल्लर रक्कम चोरून नेली असल्याचे निदर्शनास आले आहे.यातील दुकानाचे मालक हरीश नारंग हे सध्या कोपरगाव येथे वास्तव्यास आहेत.दुकानातील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

दरम्यान दुसरी घटना मच्छिंद्र यशवंत निकम यांच्या घरी घडली आहे.यातील चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि सामानाची उचकापाचक केली. मात्र,त्यांना काहीही मिळाले नाही.निकम हे समोरच असलेल्या दुसऱ्या घरात राहत असल्याने त्यांना सकाळीच चोरीची घटना लक्षात आली आहे.त्यानंतर त्यांची धावपळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.

तर तिसरी चोरी सागर माणिक डुबे यांच्या घरी झाली आहे.चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून सुमारे सात ते आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली असून खळबळ उडवून दिली आहे.त्यावेळी घरात कोणीही नसल्याने चोरट्यांना अडथळा झाला नाही.डुबे यांच्या मातोश्री मीराबाई माणिक डुबे त्या दिवशी दिंडीत सहभागी झाल्यामुळे चोरट्यांना सदर घर रिकामे सापडले होते.
तर चौथी घटना किसन विठ्ठल सोनवणे यांच्या घरी घडली आहे.चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटांची उचकापाचक केली.मात्र येथेही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.त्या वेळी हे घर देखील रिकामे असल्याने त्यांना रित्या हाती परतावे लागले आहे. चारही घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी एकाच प्रकारे कडी-कोयंडा कटरच्या साह्याने तोडल्याचे स्पष्ट झाले असून,हा प्रकार एकाच टोळीने केला असावा असा अंदाज आहे.सकाळी काही स्थानिक नागरिकांनी ही घटना लक्षात घेतल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली होती.त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक चौधरी,कॉन्स्टेबल सानप,पोलीस पाटील मिरा डुबे,अजित डुबे यांसह पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.अद्याप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही.
या घटनांनंतर माजी सरपंच योगीराज देशमुख यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की,“एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने या भागात रात्रीची गस्त वाढवावी”अशी मागणी केली आहे.गावातील नागरिकांनी पोलिसांकडून लवकरात लवकर कारवाईची मागणी केली असून,चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.