जयंती,पुण्यतिथी अभिवादन
सकारात्मक कृती घडण्यासाठी विचारांचा नियंत्रक हवा-डॉ.कोहिनकर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माणसे ज्याप्रमाणे विचार करीत असतात त्याप्रमाणेच कृती घडत जाते.विचार सकारात्मक असतील तर कृती चांगली घडते आणि तेच विचार नकारात्मक असतील तर कृतीही वाईट घडत जात असल्याचे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध लेखक व माईंड पॉवर ट्रेनर डॉ.दत्ता कोहिनकर यांनी संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“मन हे निसर्गाने आपल्याला बहाल केलेले सर्वात मौल्यवान धन आहे.जे कुणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.मनाचे बाह्यस्तर आणि आंतरस्तर ही दोन स्तर आहेत.बाह्यस्तर म्हणजे चेतन मन आणि आंतरस्तर म्हणजे अचेतन मन.अचेतन मन हे सुपीक जमिनीसारखे आहे.चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या बीजांचा ते स्वीकार करते.नकारात्मक व विध्वंसकारी विचार आपल्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करीत असतात”-डॉ.दत्ता कोहीनकर.
गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या अठराव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित कार्यक्रमात ‘ मनाची अमर्याद शक्ती व तनावमुक्ती ‘ या विषयावर ते बोलत होते.
पुणे येथील शिक्षणतज्ज्ञ अनिल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराज,जंगली महाराज आश्रमाचे मेजर सूर्यवंशी महाराज,पुणे येथील रामशास्त्री महाराज,भालुरकर महाराज,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,शिवशाहीर विजय महाराज तनपुरे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र जाधव,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,कृषी अधिकारी पंडित वाघिरे,सरपंच सुलोचना ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ताणतणाव ही संपूर्ण भारत देशाची गंभिर समस्या झालेली आहे.मधुमेह व उच्च रक्तदाब यामध्ये भारताचा क्रमांक सर्वांत वरचा आहे.ताणतणाव हा प्रत्येकालाच असतो परंतु तो सार्वजनिक करु नये. कोणतीही समस्या सार्वजनिक झाली तर त्यातून मार्ग निघण्याऐवजी ती अधिक वाढत जाते. यासाठी सकारात्मकतेने विचार करणे हाच खरा उपाय आहे असे सांगून डॉ.कोहिनकर पुढे म्हणाले,आपले मन हे निसर्गाने आपल्याला बहाल केलेले सर्वात मौल्यवान धन आहे.जे कुणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.मनाचे बाह्यस्तर आणि आंतरस्तर ही दोन स्तर आहेत.बाह्यस्तर म्हणजे चेतन मन आणि आंतरस्तर म्हणजे अचेतन मन.अचेतन मन हे सुपीक जमिनीसारखे आहे.चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या बीजांचा ते स्वीकार करते.नकारात्मक व विध्वंसकारी विचार आपल्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करीत असतात. ‘मला,” हे जमणार नाही,मी हे करूच शकणार नाही” ही नकारात्मकता अचेतन मनातून येते.यासाठी चेतन मनाकडून काही प्रेरक संदेश घेऊन स्वतःला नियंत्रित करता आले पाहिजे. ‘मला हे नक्की जमेल, आणि मी हे करणारच” ही सकारात्मक उर्जा चेतन मनाकडून आपल्याला मिळत असल्याचे प्रतिपादन शेवटी त्यांनी केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले तर उपस्थितांना शिक्षण संचालक स्वागत व प्रास्ताविक केले.सदर प्रसंगी शिक्षणतज्ज्ञ अनिल गुंजाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रसंगी महिला महाविद्यालयातील २० विद्यार्थीनींना सुमारे ९३ हजार रकमेची शिष्यवृत्ती पाहुण्यांच्या हस्ते बहाल करण्यात आली.
संवत्सर येथील श्री सहाणे टेलर यांच्यातर्फे जनता हायस्कूलमधील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेत.तर कु.स्नेहल देवराम खेमनर या विद्यार्थीनीने तयार केलेले स्व.परजणे यांचे स्केच शाळेला भेट देण्यात आले.उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले आहे.