कृषी व दुग्ध व्यवसाय
अवकाळीने नुकसान,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही-मुख्यमंत्री

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करीत आहे.अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिर्डी येथील महापशुधन प्रदर्शन समारोप कार्यक्रमात दिली आहे.
“अ.नगर जिल्हा सहकार,शिक्षण,कारखानदारी,बॅकिंग या क्षेत्रात अग्रेसर आहे.निसर्ग चक्र बदले असून अवकाळी,गारपीटने शेती पिकांचे अतोनात नुकसान होते अशा वेळेस शेतीला पूरक असा जोडधंदा करणे गरजेचे आहे”-ना.गिरीश महाजन,ग्रामविकास मंत्री,महाराष्ट्र राज्य.
राज्यात अवकाळी पावसाने नुकतीच मोठी हजेरी लावून आपले रौद्र रूप दाखवून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते.त्यामुळे राज्यात व विधान सभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भारपाईचा मुद्दा लावून धरला होता.या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री शिर्डी येथील राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
श्री.साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीत ‘थीम पार्क’ उभे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. असा शब्दांत ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिर्डीकरांना आश्वस्त केले.
सदर प्रसंगी व्यासपीठावर महसूल,पशुसंवर्धन,दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,ग्रामविकास व पंचायतराज,वैद्यकीय शिक्षण,क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन,खा. सदाशिव लोखंडे,सुजय विखे,आ.जयकुमार गोरे,बबनराव पाचपुते,राहूल कूल,मोनिका राजळे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले,’महानंदा’ चे अध्यक्ष राजेश परजणे,पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश प्रसाद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,’पशुधन हिताय,बहुजन सुखात ब्रीद’ जपत शेतकरी,पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे.’लम्पी” नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.सप्टेंबर २०२३ पर्यंत ‘लम्पी’ लस निर्मिती करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे.सरकारने सादर केलेल्या पंचामृत अर्थसंकल्पात शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे.’पशुधन’ हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे.पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे,यासाठी नवनवीन प्रजातींची माहिती प्राप्त करून घेण्याची गरज आहे.’महापशुधन एक्स्पो’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पध्दतीने शेती व पशुपालन करण्याचे ज्ञान मिळत असते.त्यामुळे ‘महापशुधन एक्स्पो’ शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.शेतकरी सन्मान योजनेत केंद्र व राज्य शासन मिळून १२ हजार रूपयांची व दुष्काळी जिल्ह्यात २१ हजार रूपयांची वार्षिक मदत दिली जाणार आहे.शेळी-मेंढी विकास महामंडळासाठी बिनभांडवली कर्जासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे.महिलांसाठी एस.टी.बसमध्ये ५० टक्के तिकिट सवलत, मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवत आहे.सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन विकास साधणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.
केंद्राच्या सहकार्यामुळे विकासाला वेग-
महाराष्ट्रातील साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र सरकारने एका बैठकीतच १० हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला.राज्याच्या पायाभूत सुविधा,शहर विकासासाठी केंद्र सरकार राज्याला हजारो कोटी रूपये देत आहे.रेल्वे,रस्त्याच्या प्रलंबित प्रकल्पासाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी सांगितले.
दूध भेसळ न करण्याचे उत्पादकांना पशुसंवर्धनमंत्र्यांचे आवाहन-
पशुसंवर्धनमंत्री श्री विखे म्हणाले की,”तीन दिवसीय महापशुधन प्रदर्शनात आतापर्यंत ८ लाख लोकांनी भेट दिली आहे.राज्य सरकार दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देत आहे.मात्र दूध भेसळ करू नका असे आवाहन करत पशुसंवर्धनमंत्री म्हणाले,”लम्पी आजारावर मोफत लस देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.निळवंडे प्रकल्पास ५ हजार १७७ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला.वाळू माफियांच्या बंदोबस्त करत सर्वसामान्यांना ६०० रूपये ब्रासने घरापर्यंत वाळू उपलब्ध करून देणारे हे सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे.सदर प्रसंगी शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त यावेळी केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पशुधन स्पर्धत प्रथम पुरस्कार प्राप्त काही पशुपालकांना शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व बक्षिस रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणासाठी (A – HELP अंतर्गत ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पशुसंवर्धन विभाग व भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा नियोजन निधी अंतर्गत ‘ई-ऑफीस’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक खा.सुजय विखे पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी मानले आहे.