पाणी पुरवठा योजना
… या गावाच्या पाणी योजनेसाठी निधी मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील संवत्सर पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी जलजीवन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला होता.परंतु सदर निधीतून पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नसल्याने अधिकच्या निधीची गरज होती.या योजनेला अधिक निधी मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशनात आ.आशुतोष काळे यांनी प्रश्न उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले होते.याची दाखल घेऊन महायुती शासनाने संवत्सर पाणी पुरवठा योजनेच्या निधीत वाढ करून ४ कोटी ५७ लाखांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.

“संवत्सर ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या निधीत वाढ होऊन सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आ.काळे यांचा पाठपुरावा सुरु होता व त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले होते.त्याची दखल घेऊन शासनाने संवत्सर पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ५७ लाख निधीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
केंद्र सरकारच्या निधीच्या टंचाईमुळे आणि आर्थिक अनियमिततेमुळे महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची जवळपास २४ ते २५ हजार कामे ठप्प झाली आहेत.ठेकेदारांची मोठी देणी थकल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे.अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आहेत.राज्यात ५१,५६० पेक्षा जास्त योजना मंजूर करण्यात आल्या होत्या,ज्यातून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट होते.अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 28 योजना ठप्प आहेत.यातील सुमारे २५ हजार ६१ योजनांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.गेल्या अडीच तीन वर्षाच्या काळात केंद्राकडून राज्याला अपेक्षित निधी मिळालेला नाही.आर्थिक वर्षाच्या अखेरीस अत्यंत नाममात्र निधी मिळाल्यामुळे राज्य शासनाचा पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.जल जीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांची तब्बल १५ हजार कोटींहून अधिक रुपयांची देणी प्रलंबित आहेत.मागील कामांची बिले मिळाल्याशिवाय नवीन कामे किंवा रखडलेली कामे पुढे न करण्याचा पवित्रा ठेकेदारांनी घेतला आहे,परिणामी ज्यामुळे योजना अपूर्ण आहे त्यांना मोठा खोडा निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी औचित्याच्या मुद्यावर हा प्रश्न उपस्थित केला होता.

त्याची दखल घेऊन सरकारने जलजीवन मिशन योजने अंतर्गत संवत्सर गावाकरिता पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे.परंतु या पाणी पुरवठा कामाची निविदा कमी दराने प्रसिद्ध झाली असून प्रत्यक्ष कामात तांत्रिक बदल करण्यात आले आणि वस्तू व सेवाकरातही वाढ झाल्याने योजनेच्या मूळ किमतीत वाढ झाली होती.त्यामुळे सदर योजनेसाठी आ.काळे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या योजनेचा सुधारित प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवला होता.
या पाणी पुरवठा योजनेच्या निधीत वाढ होऊन सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आ.काळे यांचा पाठपुरावा सुरु होता व त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले होते.त्याची दखल घेऊन शासनाने संवत्सर पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ५७ लाख निधीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे पाणी पुरवठा योजनेच्या कामातील सर्व तांत्रिक आणि आर्थिक अडचण दूर होऊन पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे संवत्सर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.



