कृषी विभाग
पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
न्युजसेवा
अहिल्यानगर,(प्रतिनिधी)
कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० असेल.स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पीक स्पर्धा तालुका,जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येत आहे.
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुका पातळीवर ५ हजार,३ हजार व २ हजार रुपये असे अनुक्रमे पहिले,दुसरे व तिसरे बक्षीस असेल.जिल्हा पातळीवर १० हजार,७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग,महाराष्ट्र राज्य,संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही श्री.नाईकवाडी यांनी शेवटी केले आहे.