कोपरगाव तालुका
काकडीतुन कृषीमाल निर्यातीसाठी कार्गो सेवा सुरू करा -सूचना

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक, औरंगाबाद विमान सेवा बंद असल्याने शिर्डी विमानतळाचे कामकाज सुरू केल्यास अहमदनगर,नाशिक,औरंगाबाद जिल्ह्यांचे शेतकरी व व्यापारी आपला शेतमाल निर्यात करू शकतील.अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर प्राप्त होईल.राज्याच्या आर्थिक व्यवस्थेस कार्गो सेवेतून हातभार लागणार असल्याने या विमानतळावरून हि सेवा सुरू करण्यासाठी तातडीने पाठपुरावा करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी काकडी विमानतळ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शिर्डी कार्गो सेवेसाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी व कार्गो विभाग तीव्र गतीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी व कायदेशीर प्रक्रियेत मदत करण्याचे आश्वासन देऊन विमानतळावरील स्थानिक कामगाराच्या अडचणी सोडविण्याबाबत सूचना आ. काळे यांनी केल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच विमान प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची काकडी विमानतळ येथे बैठक घेतली.या बैठकीत कार्गो सेवा सुरू करण्याबरोबरच विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या.त्यावेळी ते बोलत होते.
यामध्ये कार्गो सेवेसाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी व कार्गो विभाग तीव्र गतीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी व कायदेशीर प्रक्रियेत मदत करण्याचे आश्वासन त्यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.विमानतळावरील स्थानिक कामगाराच्या अडचणी जाणून घेऊन त्या वेळेत सोडविण्याचे निर्देश दिले.विमानतळ ते शिर्डी या मार्गावर दुतर्फा पथदिवे बसवावे.प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावर स्क्रिनिंग मशीन वाढवावे.पावसाळ्यात धावपट्टीवर साचणारे पाणी काकडी ग्रामस्थांना जलवाहिणीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे व विमान प्राधिकरणाने जी आश्वासने प्रकल्पबाधितांना व काकडी ग्रामस्थांना दिली आहेत त्या आश्वासनांची पूर्तता करावी.तसेच एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना विमान सेवा सुरु झाल्यास प्रवाशी सुरक्षा व लॉकडाउनचे सर्व निर्देश पाळूनच कामकाज करण्याच्या सूचना आ. काळे यांनी शेवटी दिल्या आहेत.