अपघात
रेल्वे अपघात,एक जण ठार,उलटसुलट चर्चेला उधाण!

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत दौंड – मनमाड रेल्वे मार्गावर आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रामशिंगबाबा मंदिराजवळ असलेल्या पुलावर एक इसमाचा अपघात होऊन तो ठार झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे.या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र हा अपघात आहे की घातपात याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रामसिंग बाबा पुलावर कायम जास्तीच्या संख्येने आत्महत्या होतात.त्यामुळे ही नजिकच्या गावातील एखाद्या इसमाने आत्महत्या तर केलेली नाही ना अशी शंकाही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भारतातील वाढते रेल्वे अपघात हा एक अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये प्रवाशांची सुरक्षा,लोको पायलटवरील ताण आणि निकृष्ट देखभाल ही प्रमुख कारणे आहेत.सिग्नल यंत्रणेमधील बिघाड,चुकीचा संवाद आणि जुनी तांत्रिक व्यवस्था यामुळे गाड्या रुळावरून घसरण्याच्या किंवा समोरासमोर धडकण्याच्या घटना घडतात.रेल्वेमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे लोको पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांना विहित मर्यादेपेक्षा जास्त तास काम करावे लागत आहे,ज्यामुळे सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.लोहमार्गांची नियमित आणि उच्च दर्जाची तपासणी न होणे हे देखील डबे घसरण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.अपघातांना आळा घालण्यासाठी स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली म्हणजेच ‘कवच’ यंत्रणेचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.लोको पायलटची सतर्कता वाढवण्यासाठी सर्व इंजिनांमध्ये ‘विजिलन्स कंट्रोल डिव्हाइस’ बसवण्यात आले आहे.तरीही अपघात कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीतील रामशिंगबाबा पुलावर घडली आहे.त्यात एक इसम गंभीर जखमी होऊन पडला असून त्याच्या नाकातून मोठा रक्तस्राव झालेला दिसत आहे.

दरम्यान सदर इसम मध्यम उंचीचा,गोऱ्या वर्णाचा असून त्याच्या अंगात पांढरा शर्ट,राखाडी रंगाची पँट,व गर्द निळ्या रंगाची अंडरवेअर दिसून येत आहे.दाढी पांढरी पण खुरटलेली असल्याचे दिसत आहे.त्याचे वय अंदाजे ५५-५६ वर्षे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्याची ओळख पाटण्यात अद्याप रेल्वे पोलिसांना यश आलेले नाही.मात्र तो रेल्वे प्रवासी असावा असा कयास व्यक्त होत असून तो रेल्वे प्रवासादरम्यान पडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
अद्याप या प्रकरणात मनमाड रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याची माहिती हाती आली आहे.या इसमाला कोणी ओळखत असल्यास किंवा त्या बाबत कोणाला काही माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.दरम्यान या बाबत स्थानिक नागरिकांत उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहेत.



