धार्मिक
कोपरगाव तालुक्यात मीराबाई मिरीकर यांचे किर्तन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे सालाबादप्रमाणे ऋषीपंचमीनिमित्त प्रख्यात किर्तनकार ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या किर्तन श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

संवत्सर या गांवाला पौराणिक व धार्मिक महत्व असून ऋषीपंचमीच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला येथे गोदावरी नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येत असतात.पुरातन काळात राजा दशरथाने श्रीरामाच्या जन्माच्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषींना पाचारण केले होते त्या शृंगऋषींचे भव्य मंदीर संवत्सरला गोदावरी काठावर आहे.त्यामुळे या स्थानाला वेगळे पौराणिक महत्व आहे.
प.पू.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्व. नामदेवराव परजणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या किर्तनाची परंपरा संवत्सर या गांवी आजही अव्याहतपणे सुरु आहे.विशेष म्हणजे मीराबाई मिरीकर या अखंडपणे दरवर्षी आपली किर्तन सेवा देतात.संवत्सर या गांवाला पौराणिक व धार्मिक महत्व असल्याने ऋषीपंचमीच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला संवत्सर येथे गोदावरी नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येत असतात. लाखो महिलांच्या उपस्थितीने गोदाकाठाला अक्षरशः पंढरपुराचे स्वरूप येते.पुरातन काळात राजा दशरथाने श्रीरामाच्या जन्माच्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषींना पाचारण केले होते त्या शृंगऋषींचे भव्य मंदीर संवत्सरला गोदावरी काठावर आहे.याशिवाय महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदीरही गोदावरी काठावर आहे. पलिकडच्या तिरावर कोकमठाण परिसरात पुरातन महादेवाचे हेमाडपंथी मंदीर देखील आहे.अशा धार्मिक स्थळांमुळे संवत्सरला आगळे वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे.
ऋषीपंचमीचा दिवस हा महिलांचा खास श्रध्देचा दिवस असल्याने या दिवशी फक्त म्हसीच्या दुधावर त्या उपवास करतात.गोदावरी नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधल्यानंतर संवत्सर गांवात श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात ह.भ. प.मीराबाई मिरीकर यांचे किर्तन ऐकण्यासाठी महिला जमतात.लाखोच्या संख्येने होणारी महिलांची उपस्थिती पाहून स्वतः मीराबाई यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलेले आहे.म्हणून न चुकता दरवर्षी या किर्तन सोहळ्यासाठी उपस्थित राहून किर्तन सेवा देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे.यावर्षीही बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी मीराबाई संवत्सर येथे येत असून किर्तन सेवा देणार आहेत.या किर्तन श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.