कोपरगाव तालुका
प्राथमिक शिक्षकांनी प्रयोगशीलतेवर भर देण्याची गरज-विभागीय आयुक्त
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2021/12/IMG-20211222-WA0015-780x405.jpg)
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड )
मुलांमध्ये मूल्यशिक्षण,बौध्दिक क्षमतावृध्दी,शारीरिक विकास,सामाजिक जाणिवा निर्माण करताना शिक्षकांनी प्रचलित चौकट व जाचक नियमावली बाजुला ठेऊन प्रयोगशिलतेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतीपादन नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदृष्टी देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी संभाषण व लेखन कौशल्य,विविध पुस्तकांचे वाचन करायला लावणे गरजेचे आहे”-डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हाधिकारी नगर जिल्हा.
कोपरगाव ताल तालुक्यातील संवत्सर जिल्हा परिषद शाळेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पद्मभूषण खा.बाळासाहेब विखे पाटील शैक्षणिक सभागृहाच्या उद्घाटनाबरोबरच शाळेतील मुलींना महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत साकलींचे वाटप,माझी वसुंधरा प्रकल्पांतर्गत फळवृक्ष
लागवड,गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन,जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दूध उत्पादकांना अनुदानावर दूध काढणी यंत्रांचे वितरण,डिजिटल दाखले व सातबारा वितरणाचा शुभारंभ,शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप, महानुभाव आश्रम मंदीर परिसरात वृक्षारोपन असे विविध उपक्रम यावेळी पार पडले त्या वेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे या होत्या.
सदर प्रसंगी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,नगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे,जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील,शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप,पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, वृक्ष लागवड अधिकारी पूजा रक्ताटे,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलाचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,लक्ष्मणराव साबळे आदी बहुसंख्य मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये ज्ञान मिळविण्याची प्रचंड क्षमता आहे.त्यांच्यातल्या बौध्दिक विकासाबरोबरच भावनिक विकास वाढविण्याची आवश्यकता असून शाळांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठीची संकल्पना,आखणी व अंमलबजावणी चोखपणे होणे गरजेचे आहे.संवत्सर जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमांचे व विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचे कौतूक करुन जिल्हयातील इतर शाळांमधूनही असे उपक्रम राबविले गेले तर ग्रामीण शिक्षणाचा पाया अधिकाधिक मजबूत होईल असेही शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या उपक्रमांचे कौतूक करताना,”शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदृष्टी देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी संभाषण व लेखन कौशल्य,विविध पुस्तकांचे वाचन करायला लावणे गरजेचे आहे.
सदर प्रसंगी कार्यराक्रमाचे प्रास्तविक जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर शालिनी विखे आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे व शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख यांनी केले तर गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांनी आभार व्यक्त केले आहे.