शिर्डी लोकसभा मतदार संघ विकास कामे
केंद्रपुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करा- …या नेत्याचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ निदर्शनास आणून द्याव्यात.केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत व पारदर्शकपणे मिळावा,यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करत संवाद-समन्वयातून केंद्रपुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतेच अहिल्या नगर येथील एका बैठकीत दिले आहेत.

“ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी.तसेच या कामांचा स्वतंत्र आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करावी. ग्रामीण भागातील नागरिकांच्या बँकिंग व्यवहारांबाबत संवेदनशीलता ठेवून बँकांनी कर्ज वितरणासह इतर सेवा सुलभ कराव्यात.नागरिकांना किरकोळ कामांसाठी बँकांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत,यासाठी प्रभावी कार्यपद्धती विकसित करावी” -खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार निलेश लंके,आ.विवेक कोल्हे,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे,उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक,प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

खा.भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की,”योजनांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी असल्यास त्या तत्काळ समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात.केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करून त्या दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.प्रधानमंत्री कुसुम (पीएम-कुसुम) योजनेतील प्रलंबित अर्जांचा जलदगतीने निपटारा करून पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल,याची दक्षता घ्यावी.नादुरुस्त रोहित्रांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. अखंड वीजपुरवठ्यासाठी रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच मागणीनुसार नवीन रोहित्रे उपलब्ध करून द्यावीत.भविष्यातील वाढती वीजगरज लक्षात घेऊन जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य द्यावे.शासकीय कार्यालये,जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रणाली उभारण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी.तसेच या कामांचा स्वतंत्र आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करावी. ग्रामीण भागातील नागरिकांच्या बँकिंग व्यवहारांबाबत संवेदनशीलता ठेवून बँकांनी कर्ज वितरणासह इतर सेवा सुलभ कराव्यात.नागरिकांना किरकोळ कामांसाठी बँकांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत,यासाठी प्रभावी कार्यपद्धती विकसित करावी.तसेच विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात दर्जेदार,मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करावा,असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित कामांना गती द्या
समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार निलेश लंके म्हणाले की,”जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती द्यावी तसेच मंजूर योजनांची वेगाने अंमलबजावणी करावी.महानगरपालिका क्षेत्रातील पाईपलाईनद्वारे गॅस जोडणीच्या कामांना चालना देण्यात यावी.जिल्ह्यात मंजूर झालेल्या विद्युत उपकेंद्रांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी विशेष प्रयत्न करावेत.ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा वेग वाढवून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.लाभार्थी तसेच बेरोजगार युवकांना विविध योजनांसाठी कर्ज मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत.बँकांनी सकारात्मक भूमिका घेत पात्र लाभार्थ्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे.शासनाच्या विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणाऱ्या अनुदान अथवा लाभाच्या रकमेतून कर्जाची रक्कम थेट कपात करू नये.शासनाचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचेल,याची बँकांनी दक्षता घ्यावी,असे निर्देश त्यांनी दिले.बैठकीत विविध केंद्रपुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.प्रलंबित कामे,अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.



