समाजकल्याण विभाग
…या योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याची गरज!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकांव्ये केले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत निराधार,वृद्ध,विधवा,परित्यक्ता,अनाथ मुले आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना दरमहा ₹१,५०० चे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात दिले जाते.
शासनाने लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवणे,योजनांमध्ये पारदर्शकता आणणे तसेच पात्र लाभार्थ्यांना नियमित व विनाअडथळा योजनांचा लाभ मिळावा,या उद्देशाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही,त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे.ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड,आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेतू सुविधा केंद्र,महा-ई-सेवा केंद्र,तहसील कार्यालय किंवा संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा.ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध सुविधांचाही लाभ घ्यावा.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे चालवली जाणारी एक कल्याणकारी योजना आहे.याद्वारे ६५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹ १५०० चे आर्थिक अर्थसहाय्य दिले जाते. दिव्यांगांसाठी ही रक्कम दरमहा ₹ २५०० आहे.
३० जुलै च्या आत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांचे अनुदान किंवा निवृत्तीवेतन वितरणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक,निराधार महिला,विधवा,दिव्यांग तसेच गरजू लाभार्थ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे. कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता शासनाने दिलेल्या सूचनांनुसार ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.
तसेच महसूल,समाजकल्याण व ग्रामविकास विभागातील अधिकारी,कर्मचारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,आशा व अंगणवाडी सेविका यांनी आपल्या परिसरातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेतांना भविष्यात कोणत्याही अडचणी येवू नये यासाठी ई-केवायसी बाबत माहिती देऊन ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशा सूचना केल्या आहेत.राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत नियमितपणे पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने ई-केवायसी करून घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.



