कोपरगाव तालुका
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून वीज उपकेंद्र कार्यान्वित करा-आ.काळे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील व सिन्नर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या गावातील शेतकर्यांना भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासह शहा येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करा.शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून वीज उपकेंद्र कार्यान्वित करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“कोपरगाव,सिन्नर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या बहुतांश गावातील शेतकऱ्यांना तसेच सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाच्या गावातील शेतकऱ्यांना या १३२ केव्ही वीज उपकेंद्राचा मोठा फायदा होणार आहे.शहा येथील १३२ के.व्ही.ए.चे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना फायदा होवून विजेच्या समस्या मार्गी लागणार आहे”-आ.आशुतोष काळे
माजी आ.अशोक काळे व आ.माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागाच्या गावातील तसेच सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शहा येथे १३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करून आणले होते. मात्र २०१४ साली सत्तांतर झाल्यांनतर या उपकेंद्राचे काम थांबलेले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच आमदार आशुतोष काळे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा या वीज उपकेंद्राच्या कामाला चालना दिली. हे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी आ.काळे व सिन्नरचे आ. कोकाटे यांनी संयुक्तपणे नुकतीच या वीज उपकेंद्राची पाहणी केली.यावेळी आमदार आशुतोष काळे बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सिन्नर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या बहुतांश गावातील शेतकऱ्यांना तसेच सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाच्या गावातील शेतकऱ्यांना या १३२ केव्ही वीज उपकेंद्राचा मोठा फायदा होणार आहे. शहा येथील १३२ के.व्ही.ए.चे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना फायदा होवून विजेच्या समस्या मार्गी लागणार असून कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघणार आहे.त्यामुळे वारंवार रोहित्र नादुरुस्त होणे व शेतकऱ्यांचे वीजपंप जळणे आदी समस्या सुटणार आहे.कोपरगाव तालुक्यात ५९ पैकी जवळपास ३० टॉवर उभारले गेले असून २९ टॉवरचे काम अद्यापही बाकी आहे हे काम तातडीने पूर्ण करावे.१३२ केव्ही वीज उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी आमदार माणिकराव कोकाटे व मी स्वतः जातीने लक्ष देणार असून महावितरणला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना येत असलेल्या विजेच्या समस्याची दखल घेऊन या समस्या सोडवून हे वीज उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.