कृषी विभाग
पुरेशा पावसानंतर पेरणी करा-…यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घाईगडबड न करता जमिनीमध्ये ८० ते १०० मिमी (३ ते ४ इंच) इतका पुरेसा पाऊस पडून जमिनीत योग्य ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन कोपरगाव येथील तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त,त्यांच्या शेती क्षेत्रातील महान योगदानाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो.वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना शेती उत्पादन वाढवण्यासाठी,सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरणे राबवली.त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून १ जुलै हा दिवस ‘कृषि दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे”-स्वप्नील वाळुंज,गटविकास अधिकारी, कोपरगाव पंचायत समिती.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती कोपरगाव सभागृहात कृषि दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न असला आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज,किटक तज्ञ भरत दवंगे,पंचायत समितीचे कृषि अधिकारी सचिन कोष्टी,कृषी विभागातील सहायक कृषि अधिकारी,उप कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी,इतर अधिकारी कर्मचारी,कृषि सखी महिला,पंचायत समितीचे अधिकारी कार्मचारी तसेच तालुक्यातून शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” जमिनीत योग्य वापसा असेल तर यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते आणि पावसाचा ताण बसल्यास पिकांचे नुकसान टळते.पेरणी करताना जमिनीत किमान १५ ते २० से.मी.खोलपर्यंत ओलावा असणे गरजेचे आहे.पेरणीपूर्वी बियाणांना बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे,जेणेकरून पिकांवर सुरुवातीला रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.कोरडवाहू शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.यामुळे एक पीक वाया गेले तरी दुसरे पीक हाती राहत असल्याचे आवाहन शेवटी तालुका कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.



दरम्यान यावेळी सर्वाधिक उत्पन्न काढणारे शेतकरी गोरक्षनाथ वनाजी शिंदे,(रांजणगाव देशमुख),विश्वनाथ रावबा थोरात (जवळके),हर्षल भाऊसाहेब पाचोरे,विशाल संजय पाचोरे,(दोघे बहादराबाद),विजय कुंडलिक शिंदे(जवळके) आदींचा रोख रक्कम,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.त्यांचे कोपरगाव तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे नवोदित गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज यांनी शेतकरी दिनाचे महत्व सांगताना,”महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो.हा दिवस महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त,त्यांच्या शेती क्षेत्रातील महान योगदानाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो.वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना शेती उत्पादन वाढवण्यासाठी,सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरणे राबवली.त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून १ जुलै हा दिवस कृषि दिन म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे वाळुंज यांनी शेवटी सांगितले आहे.

यावेळी प्रसिद्ध कीटक शास्रज्ञ म्हणून२९ वर्ष सेवा केलेल्या भरत दवंगे यांनी म्हटले आहे की,” सद्यस्थिती पाहता पेरणीला जवळपास २३ -२४ उशीर झाल्याने नेमकी आता कोपरगाव तालुक्यात खरीपात घेण्यात येणारी मुख्य पिक सोयाबीन व मका यांच्या कोणत्या वाणाची पेरणी करावी,कशी पेरणी करावी,कीड व रोग तसेच डाळिंब पिकात कायम येणारी कीड व रोग नियत्रण साठी करावयाच्या उपाय योजना ह्याबाबत उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले व काही शेतकरी बांधवांनी विचारलेल्या शकांना उत्तरे दिली आहेत.

यावेळी प्रारंभी स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आहे.यावेळी प्रास्तविक उपकृषी अधिकारी सुनिल घारकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपकृषी अधिकारी श्री.ठाकरे यांनी मानले आहे.



