महावितरण विभाग
ग्रामीण भागातील रात्रीचे भारनियमन तातडीने बंद करावे -…या आमदारांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.विशेषतः शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असून,रात्रीच्या वेळी होणारे वीज खंडित होणे ही गंभीर बाब आहे.याची दखल घेत आ.विवेक कोल्हे यांनी महावितरण प्रशासनाकडे ग्रामीण भागातील रात्रीचे भारनियमन तातडीने बंद करण्याची मागणी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

“उन्हाळा व पावसाळ्याच्या वातावरणात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित,नागरिकांची सुविधा आणि ग्रामीण भागातील सामान्य जनजीवन सुरळीत राहण्यासाठी महावितरण प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन रात्रीचे भारनियमन बंद करावे”-आ.विवेक कोल्हे,कोपरगाव.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,सध्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थी नियमित अभ्यास, गृहपाठ तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीत व्यस्त आहेत.अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अडचणी निर्माण होत आहेत.ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे पर्यायी प्रकाशव्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याशिवाय,शेतकरी,लघुउद्योजक,व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही वारंवार होणाऱ्या भारनियमनाचा फटका बसत आहे.
उन्हाळा व पावसाळ्याच्या वातावरणात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित,नागरिकांची सुविधा आणि ग्रामीण भागातील सामान्य जनजीवन सुरळीत राहण्यासाठी महावितरण प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन रात्रीचे भारनियमन बंद करावे,अशी मागणी आ.विवेक कोल्हे यांनी केली आहे.तसेच कोपरगाव तालुक्यात अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात,अशी अपेक्षाही शेवटी आ.कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.



