कोपरगाव शहर वृत्त
विरोधशून्य काळात विकास झाला नाही तर..जबाबदार कोण ? -…यांचा सवाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्याच्या सत्तेत जवळपास तीस नगरसेवक दोन आमदार,एक खासदार आदी पस्तीस लोक असताना शिवाय विरोधात कोणीच नसताना तालुक्याचा आगामी पाच वर्षात विकास झाला नाही तर जबाबदार कोणाला धरणार ? असा कडवा सवाल कोपरगाव येथील प्रसिद्ध बिल्डर प्रसाद नाईक यांनी सत्ताधारी गटाचे विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान यांना कोपरगाव येथील एका कार्यक्रमात विचारला असून त्यावर कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

“कोपरगाव शहराला सुसज्ज आणि आधुनिक बनवण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे.नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर न राहता,त्यावर टप्प्याटप्प्याने ठोस उपाययोजना केल्या जातील यासाठी ही चर्चा महत्वाची ठरणार आहे.तसेच चार महिन्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा अशा पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे”-आ.विवेक कोल्हे,विधानपरिषद.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याचा विकास हा प्रामुख्याने शेती,सातत्याची पाणी टंचाई,आणि रखडलेले औद्योगिक व सहकार प्रकल्प,बेरोजगारी,निकृष्ट रस्त्यांचे न संपणारे दृष्टचक्र यामुळे अडचणीत आला असून,स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पावसाची अनिश्चितता आणि भूजल पातळी घटल्यामुळे शेतीला पाणी टंचाई निर्माण होत असून बागायती क्षेत्र संपल्यात जमा आहे.अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे गणित बिघडते.सहकारी साखर कारखाने आणि स्थानिक उद्योगांमधील मंदीमुळे युवकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण भागातील रस्ते,वीज आणि आरोग्य सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची गरज आहे.मात्र या बाबीत पूर्ण शुकशुकाट असल्याने बरेच नागरिक शहर सोडून जाताना दिसत आहे.त्यामुळे आगामी दशकात हे शहर सेवानिवृतांचे बनण्याच्या वाटेवर आहे.तरुणाई शिक्षित झाल्यानंतर या तालुक्यात आणि शहरात थांबण्यास तयार नाही.साखर कारखानदार उर्वरित तरुणांना आपल्या ताफ्यात दखल करून पूर्ण वेळ राजकारणात आणि धन व्यवहारात अडकून मद्याच्या दृष्ट चक्रात अडकून पडत असताना व तालुक्यातील विरोधक सत्ताधारी वर्गाने औषधाला न ठेवल्याचे पार्श्वभूमीवर काल विधान सभेचे आ.विवेक कोल्हे यांनी ‘कृष्णाई बँक्वेट हॉल’ येथे कोपरगाव शहरासह मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्हिजन कोपरगाव मंचच्या पुढाकाराने ‘संवादातून सुविधेकडे’ या विशेष (?) संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यावेळी कोपरगाव येथील प्रसिद्धी बिल्डर प्रसाद नाईक यांनी सत्ताधारी वर्गाला आरसा दाखवला असून त्यापासून ते कोणता बोध घेणार याकडे शहरातील सुशिक्षित वर्ग,उद्योजक,डॉक्टर,वकील,इंजिनिअर आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर,कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,लायन्स चे प्रांतपाल राजेश ठोळे,जिल्हा परिषदेचे माजी गट नेते केशवराव भवर,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात,चेतन खुबानी,डॉ.दत्तात्रय मुळे,अशोक कोठारी,संजय बंब,संजय भन्साळी,नितीन भुसारे, दिपक विसपुते यांनी आपले विचार मांडले आहे.दुसऱ्या सत्रात पायाभूत सुविधांवर प्रकाश टाकण्यात आला या चर्चेसाठी डॉ.डी.एस.मुळे,राजेश ठोळे,डॉ.राजेंद्र श्रीमाळी,प्रसाद नाईक,संतोष भट्टड,प्रा.रियाज शेख,प्रा.वृंदा कोऱ्हाळकर यांनी संवाद साधला असून या चर्चासत्रात बहुसंख्येने व्यापारी,विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

“कोपरगाव शहरातील प्रलंबित कामे आपण मार्गी लावणार असून त्यात काही रस्त्यांची कामे प्रलंबित होणार आहे.कारण भूमिगत गटारीची खोदाई कामे सुरू आहे.मोकाट जनावरांसाठी नगरपरिषद गोशाळा उभारत असून हा प्रश्न देखील आता सुटण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.या उपक्रमामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील दुवा अधिक घट्ट झाला असून,कोपरगावच्या विकासाला नवी दिशा मिळेल”-पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
त्यावेळी त्यांनी सत्ताधारी वर्गाची चांगलीच फिरकी घेतली असून पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहरात पुढे रस्ते आणि त्यांची कामे होतात आणि नंतर पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा आणि आरोग्य विभाग ते मनोभावे खोदण्याचे काम करताना दिसत आहे.त्यासाठी काही नियोजन आहे की नाही असा कडवा सवाल केला आहे.आ.विवेक कोल्हे यांनीच मागे एक आरोप केला होता.समृद्धीचे महामार्गाचे काम सर्वत्र 710 किमी.चांगले झाले पण कोपरगाव तालुक्यातील 40 किमी.काम निकृष्ट झालं असल्याच्या आरोपाची आठवण करून दिली.व आपण ज्याला आणतो तो आपले कोट कल्याण करतो अशी मल्लिनाथी केली आहे.याचाच अर्थ राज्यात आणि देशात सर्वत्र ठेकेदार चांगले मिळतात पण कोपरगाव तालुक्याला ते मिळत नाही.सर्व नागरिकांना चुकीचे काम होताना दिसत असेल तर त्याला विरोध करण्याचा लोकशाहीने अधिकार दिला असल्याची आठवण करून दिली आहे.त्यांचे मध्येच नगराध्यक्ष पराग संधान यांनी खंडन करण्याचा प्रयत्न केला असता तुमचे आम्ही अडीच तास ऐकून घेतले आहे.आता आम्हाला बोलू द्या अशी विनंती करून आता तालुक्यात विरोधकच राहिलेला नाही.त्यामुळे विरोध नसलेल्या तालुक्यात आणि शहरात तुम्हाला पुढील वेळेला आरोप करण्याची सोय उरणार नाही,आणि असे चर्चासत्र भरवता येणार नाही,तुम्ही सत्तेत असताना अपेक्षित रिझल्ट आला नाही तर जनतेचा संताप होऊ शकतो असा इशारा दिला आहे.तुम्ही आधी शंभर दिवसाची कामे पूर्ण करा मगच बाकी कामाची स्वप्ने बघा असे सांगण्यास ते विसरले नाही.आता शंभरच्या ठिकाणी दोनशे दिवस उलटत आले आहे” जवळपास स्वातंत्र्याला 80 वर्षे उलटली आहे.आपण पायाभूत असलेले साधे पिण्याचे आणि शेती सिंचनाचे पाणी,चालण्यास चांगले रस्ते,पथदिवे, तरुणांना रोजगार आणि वापरण्यास वीज देऊ शकलो नाही.याची रास्त आठवण करून सत्ताधारी वर्गाला जमिनीवर आणण्याचे काम केले असल्याचे मानले जात आहे.त्यावेळी शेवटी त्यांनी आम्ही सर्व व्यापारी आणि उद्योजक आमचे व्यवसाय वाढविण्यास आलो असताना एक डॉ.दत्तात्रय मुळे हे स्वतःचा व्यवसाय कमी करण्यास आले असल्याची कोपरखिळी मारली आहे.कारण शहरातील रस्ते चांगले झाले आणि धूळ कमी झाली तर रुग्ण कसे वाढणार ? पर्यायाने तुमचा व्यवसाय कमी होईल असा सल्ला दिल्याने उपस्थितांत हास्याचे फवारे उडाले आहे.
या बैठकीत उपस्थित नागरिकांनी शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करणे,मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण,खड्डे मुक्त रस्ते,नागरिकांचे अनेक बळी घेणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावणे,विकास कामे करताना चांगल्या दर्जाचे करावे,कोपरगावात बाजारपेठ हलवण्यासाठी नवनवीन उद्योगांना चालना द्यावी,युवा व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे,पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात आदी अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा,ड्रेनेज लाईनची दुरुस्ती आणि स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी डॉक्टर्स व अभियंत्यांनी केली.स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन व्यवसायांना चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले.

संवाद कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले,”कोपरगाव शहराला सुसज्ज आणि आधुनिक बनवण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे.नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर न राहता,त्यावर टप्प्याटप्प्याने ठोस उपाययोजना केल्या जातील यासाठी ही चर्चा महत्वाची ठरणार आहे.तसेच चार महिन्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा अशा पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन देखील विवेक कोल्हे यांनी आयोजकांना केले आहे ते किती पाळणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
नगराध्यक्ष पराग संधान यांनीही नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.काही काळ रस्त्यांची कामे विलंब होतील कारण भूमिगत गटारीची कामे सुरू आहे त्यामुळे पुन्हा रस्ता खोदावा लागू नये यासाठी उशीर होतो आहे.मोकाट जनावरांसाठी नगरपरिषद गोशाळा उभारत असून हा प्रश्न देखील आता सुटण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.या उपक्रमामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील दुवा अधिक घट्ट झाला असून,कोपरगावच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास शेवटी व्यक्त केला आहे.


