दळणवळण
शिर्डी ते सेंधवा रस्ता तातडीने हस्तांतरित करा-मागणी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला शिर्डी ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आला आहे मात्र अद्यापपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए. आय.कडे हस्तांतरीत झाला नसून हा महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे असे साकडे आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घातले आहे.
गत काही दिवसात या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.सावळीविहिर नजीक नुकतेच तीन नागरिकांचे प्राण गेले आहे तर कितीतरी जण जखमी झाले आहे.मात्र सार्वजनिक विभागाचे या कडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टींने अत्यंत महत्वाचा दक्षिण-उत्तर असलेला व काही महिन्यांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या सावळीविहीर ते सेंधवा या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.या मार्गावरून नियमितपणे एक लाख मेट्रिक टन वजनाच्या जवळपास दहा हजार वाहनांची दैनिक वर्दळ असते.कोपरगाव तालुक्याच्या शेजारीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान असल्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मागील काही दिवसात या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.सावळीविहिर नजीक नुकतेच तीन नागरिकांचे प्राण गेले आहे तर कितीतरी जण जखमी झाले आहे.मात्र सार्वजनिक विभागाचे या कडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.
या मार्गाचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होऊन उच्च दर्जाचे काम व्हावे यासाठी हा महामार्ग एन.एच.ए.आय.कडे लवकरात लवकर हस्तांतरीत होणे गरजेचे असल्याचे आ. काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण लक्ष घालू अशी ग्वाही पवार यांनी दिले आहे.