जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

रब्बी हंगामाचे नियोजन नाही,गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत संताप !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनही गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आपली पिके उभारण्यासाठी पाण्याचे आवर्तन नेमके कधी मिळणार याबाबत कुठलेही वेळापत्रक जलसंपदा विभागाने जाहीर केलेले नाही त्यामुळे सदर नियोजनासाठी रब्बी नियोजनाची बैठक घेऊन आवर्तने जाहीर करावी अशी महत्वपूर्ण मागणी येथील शेतकरी व कार्यकर्ते तुषार विध्वंस व प्रवीण शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तथा उपसचिव डॉ.संजय बेलसरे यांनी या मागणीची दखल घेतली असून या प्रकरणी नाशिक विभागास रब्बी हंगामाचे नियोजन करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना दिले असल्याची माहिती कार्यकर्ते तुषार विध्वंस यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

याबाबत त्यांनी नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की,”दि.१४ नोव्हेंबर रोजी गोदावरी कालव्यासाठी रब्बी हंगाम सन २०२२-२०२३ साठीचे नमुना न.७ साठी पाटपाणी मागणीसाठीचे जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले असून विभागीय कालवा सल्लागार समितीची शेतकऱ्यांसाठीची विभागीय शासकीय बैठक न घेता व शेतकऱ्यांची पाण्याची मागणी तसेच पाटपाण्यासंबंधी तक्रारी व पिकांचे नियोजन जाणून न घेता तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रगटन जाहीर केले असल्याचा आरोप केला आहे.

जलसंपदा विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या आदेशाप्रमाणे नियोजन बैठका विभागात घेऊन व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच सर्व समन्वयाने आवर्तने संख्या व त्याच्या तारखा त्याच बैठकीत घोषित करणे अभिप्रेत आहे.[शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०१९/(प्र.क.३५८/२०१९)/सिं.व्य.(कामे) दिनांक २५ फेब्रुवारी २०२० नुसार] परंतु तसा आदेश असताना देखील त्या आदेशाचा अवमान करून दरवर्षी पाटबंधारे विभागामार्फत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात येते हि निंदनीय घटना आहे.

मागील वर्षी म्हणजे २ ऑक्टोबर २०२१ रोजी कोपरगाव उपविभागाच्या कार्यालयाच्या आवारात आपण व आपले सहकारी प्रविण आप्पासाहेब शिंदे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळेस कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेनुसार आम्हास प्रत्यक्ष लेखी उत्तर देऊन आश्वासित केले होते.त्यात त्यांनी “सर्व विभागातील कालवा सल्लागार समितीच्या बैठका वेळेवर नियमाप्रमाणे घेऊन तारखा त्याच बैठकीत घोषित करू असे आश्वासन दिले होते.मात्र त्याला यावर्षी हरताळ फासला आहे.यातून लाभधारक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असल्याचा आरोप केला असून यात शासन आदेशाची देखील पायमल्ली झालेली असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.

आपण या पूर्वी वारंवार विभागीय कालवा सल्लागार समितीची बैठकीची तारखेबद्दल विचारणा केली असताना त्यास केराची टोपली दाखवली आहे.संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत नमुना न. ७ च्या प्रगटना बद्दल दि. २३ नोव्हेंबर रोजी विचारणा केल्यावर वर्तमानात ग्रामपंचायतीची आचारसंहिता लागू असल्यामुळे बैठक घेणे शक्य होणार नसल्याची बाब पुढे केली आहे.व सदर बैठक नंतर घेण्याचे गाजर दाखवले आहे.परंतु शेतकऱ्यांचे पाटपाणी नियोजन शासकीय बैठकीसाठी आचारसंहितेचे कारणे देणे योग्य नाही व तसे कारण देतांना आचारसहिंता लागू होण्या अगोदर संपूर्ण महिना का बैठका घेतली गेली नाही याचे उत्तर देण्यात टाळाटाळ केली आहे. वेळेवर बैठक न घेतल्याने गोदावरी कालवा लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नियोजन करणेकामी अडचणीचे ठरत आहे.

गतवर्षी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व प्रगतशील शेतकरी पद्मकांत कुदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत जलसंपदाचे मुख्यअभियंता डॉ.संजय बेलसरे व नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांचे लक्ष वेधून घेऊन रब्बी आवर्तन व सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्रात घेण्याची मागणी केली होती.त्यावेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

जाहीर केलेले प्रगटन हे अद्यापही जवळपास ९५ % लोकांपर्यंत पोहोचलेले देखील नाही,प्राप्त झालेले नाही व शेवटची मुदत दि. ३० नोव्हेंबर पर्यंतची आहे असे असतांना मागणी अगदी नगण्य स्वरुपात प्राप्त होणार आहे कारण आवर्तन संख्या व त्यांच्या तारखा अध्यापही घोषित नाही असे आसतांना पिकांचे नियोजन करणे शक्य होणार नाही व मुबलक पाणी उपलब्ध असून देखील केवळ नियोजनाअभावी शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया जाणार आहे तसा अनुभव गेल्या मागील दोन वर्षापासून पाटबंधारे विभागास व शेतकऱ्यांना येतो आहे.नैसर्गिक संकटामुळे आधीच चालू वर्षीचा खरीपाचा हंगाम वाया जाऊन प्रचंड नुकसान झालेले आहे व त्यात रब्बी हंगाम देखील वाया गेल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे.

शासकीय नियमाप्रमाणे व कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार रब्बी हंगामासाठी हा उशिरात १५ डिसेंबर पर्यंत गहू,हरबरा पेरणी करावी.त्यामुळे आम्ही आपणास नम्र विनंती करितो की आपण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कालवे प्रवाहित केल्यास व पाणी आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांकडून जागेवर तातडीने पाणी मागणी अर्ज भरून घेतल्यास रब्बी हंगामाचा कालावधी वाया जाणार नाही असे आवाहन शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close