जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विकास कामे हाणून पाडण्याचा कोल्हे गटाचा कुटील डाव उघड-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अठ्ठावीस कामांबाबत जनतेत गैरसमज पसरवणारी खोटारडी पत्रकार परिषद कोल्हे गटाने नुकतीच घेतली असली तरी न्यायालयासमोर दुसरी खरी बाजू गेल्यावर उच्च न्यायालय दिलेली स्थगिती लवकरच उठवेल असा विश्वास व्यक्त करून कोल्हे गट विकास कामे होऊ नये म्हणून या थराला जाईल असे वाटले नव्हते त्यांचा आता कुटील डाव उघड झाला असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच केला आहे.

“कोल्हे यांचा इतिहास कुटील असाच आहे.धारणगावसह पाच गावांची पाणी योजना १९९७ साली स्व.सूर्यभानजी वहाडणे यांनी मंजूर करून घेतली.८०% कामही झाले,पण युतीचे शासन गेल्यानंतर आजपर्यंत ही योजना अपूर्णच.दुसऱ्यांना श्रेय जाऊ नये यासाठी आडकाठी आणण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले आहे”-नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विविध रस्त्यांसह अठ्ठावीस कामे राजकीय कारणातून अडवून धरल्याने याबाबत वाद नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी साधारण फेब्रुवारी महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे नेला होता.त्या बाबत सुनावणी पूर्ण झाली होती त्या बाबतचा निकाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दि.२३ मार्च रोजी जाहीर केला होता.त्या बाबत कामाचे आदेश संबंधित ठेकेदारांना होऊन त्यांनी जवळपास बहुतेक कामांना प्रारंभ केला होता.मात्र अस्वस्थ कोल्हे गटाच्या हा विषय पचनी पडला नाही व त्यांनी या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या निकालाला दि.२५ जून रोजी आव्हान दिले आहे.व त्या स्थिगितीचे आदेश नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे पदाधिकारी व माजी पदाधिकारी यांनी या आदेशाची प्रत ३० जून रोजी स्वहस्ते दिली आहे.त्या नंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून कोल्हे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी व त्या नंतर हे सत्र अद्याप थांबले नसून आज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज आपली पत्रकार परिषद घेतली असून आपली भूमिका विशद करताना हा आरोप केला आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,” जिल्हाधिकारी यांनीं २३ मार्चला निर्णय दिल्यानंतर एक महिन्यात विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिल दाखल करता येते म्हणून आम्ही एक महिन्यानंतर ठेकेदारांना अनामत रक्कम भरण्याचे पत्र देऊन प्रक्रिया पूर्ण केली.दोन महिन्यात कार्यादेश दिले तरीही आम्ही कार्यादेश द्यायला ४-५ महिने उशीर केल्याचा व मुख्याधिकारी यांनी जातांना घाईघाईत कार्यारंभ दिल्याचा आरोप हा भंपक ठरत असल्याचा दावा केला आहे.

आमचा फक्त सहा-सात कामांवरच आक्षेप आहे असे म्हणणाऱ्यांनी इतर बावीस कामेही का नामंजूर केली ? निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत विरोध करायचा व कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा डाव आहे.सर्वसाधारण सभेत विषय क्र.११ च्या चर्चेत सर्व २८ कामे वाचून दाखवा असे आपण म्हणत असतांना बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून हा विषयच नामंजूर करणारे आज खोटे बोलत आहेत,सभेचे चलचित्रण हा त्याचा पुरावा आहे.

नगरसेवक अनिल आव्हाड यांनी मात्र.”मला राजकारणाशी घेणेदेणे नाही,माझ्या प्रभागातील काम करावेच लागेल”असे आक्रमकपणे सांगितल्याने त्यांचे काम मंजूर झाले.इतर नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत म्हणून आग्रह धरला नाही,कारण वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी यांनी २३ मार्चला निर्णय दिल्यानंतर दि.०५ एप्रिल रोजी आपण सर्व नगरसेवकांना,”तुमच्या प्रभागातील कामे करायचे कि नाही”असे लेखी दिले व त्यांना त्याबाबत अभिप्राय कळविण्यास सांगितले होते.तथापि आज पर्यंत कोल्हे गट लेखी द्यायला तयार नाही.आमचा सर्व कामांना विरोध नाही असे ते खोटेच सांगतात.मात्र,”कोल्हे गटाच्याच २-३ नगरसेवकांनी मात्र आमची कामे करा” असे लेखी कळवले आहे.सर्वांनाच कामे व्हावीत असे वाटते पण नेत्यांच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

खरे तर अंदाजपत्रक म्हणजे अंदाजपत्रक.काम पुर्ण झाल्यानंतर मोजमाप करूनच देयके दिली जातात हे उघड आहे.हे ज्ञात असूनही कोल्हे गट वेड्याचे सोंग घेत आहे.पेव्हर ब्लॉक बसविले नाहीत,दुभाजक लावले नाहीत तर त्याचे देयक होणारच नाही.पुन्हा अंदाजपत्रक करा म्हणणे हे ठरवून घेतलेले झोपेचे सोंग आहे.कामे व्हायच्या आधी ज्यांना भ्रष्टाचाराचा वास येतो अशाना शासनाने पोलीस विभागात श्वान पथकाचे प्रमुख म्हणूनच नेमले पाहिजे असा शालजोडाही त्यांनी लगावला आहे.कोल्हे गटाने भ्रष्टाचाराबद्दल न बोललेले बरे.४२ कोटींच्या पाणी योजनेचे ठेकेदाराकडून कोल्हे गटाच्या एकही नगरसेवकाने किंवा त्यांच्या नेत्यांनी पैसे उकळले नसणार याची जनतेला खात्री असल्याचा शालजोडाही त्यांनी लगावला आहे.

ज्या दोन कामांचा उल्लेख त्यांनी केला ते प्रभाग क्रं.०३ मधील खडीकरण व प्रभाग क्रं.०५ मधील गटार ही दोनही कामे स्थगित ठेवण्याचे आपण १६ फेब्रुवारीच्याच सर्वसाधारण सभेत सांगितले होते तसे सभेचे चलचित्रण आहे.प्रभाग क्रं.०५ मधील माझे मित्र मात्र आज खोटे बोलताहेत.८४ लाखांच्या गटारीचे काम ज्ञानेश्वर गोसावी यांना मिळत नाही असे लक्षात आल्यावर हे काम करू नका असे ते म्हणायला लागले.आपण म्हणतो ते खरे आहे कि नाही हे संबंधित नगरसेवकांनी शपथपुर्वक सांगावे.माजी नगराध्यक्ष म्हणतात कि,”आम्हाला २५% मिळतात.त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ज्या नेत्यांनी ३५० कोटी रूपयांचा निधी आणला त्यातून त्यांना किती टक्के मिळाले ? हे विचारून बघावे अशी कोपरखिळी मारली आहे.

चार वर्षे स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत यासाठी सहकार्य करणारे-गोड बोलणारे विधानसभा पराभवानंतर मात्र “शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर वहाडणे विरुद्ध बोलायचे काय? “या भीतीने नेत्यांच्या आदेशानुसार विरोध करू लागले.”विषय नामंजूर करा-तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी माझी” असा उर्मट आदेश युवराजाने दिल्यानंतरच वातावरण बिघडले.ऑन लाईन टेंडर प्रक्रिया असतांना मुर्खपणे म्हणतात कि,घरात बसून कामे वाटली.एस. जी.विद्यालय रस्ता व गुरुद्वारा रोड हे दोनही कामे करणारे ठेकेदार कोल्हे यांच्या कन्येच्या शिक्षण संस्थेत विश्वस्त होते हे मी यापूर्वीच सांगितले होते.

कोल्हे गटाचे अनेकांना व संबंधितांना बांधकाम परवानगी-पूर्णत्वाचे दाखले देतांना मुख्याधिकारी सरोदे यांनी किती पैसे घेतले हे त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. युवराजाला सलाम करायला तत्कालीन मुख्याधिकारी सरोदे यांनी जावे असे कोल्हे गटाने अनेकदा प्रयत्न केले होते.पण ते बधले नाहीत,यामुळेच आरोप जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

असे आरोप करून नविन येणारे मुख्यधिकाऱ्यावर दबाव आण्याचाच हा प्रयत्न आहे.श्री सरोदे यांनी शहरविकास करण्यासाठी आपल्याला साथ दिली हे त्यांच्या दृष्टीने त्यांचे मोठे पाप आहे.आपण छातीठोकपणे सांगतो,आमच्या कारकिर्दीत सर्वात जास्त विकासकामे झालेली आहेत.पाच क्रमांक तलावाचे कामही आम्हीच मार्गी लावत असल्याचा दावाही त्यानी केला आहे.

पोहण्याच्या तलावाचे थडगे बांधणारे,स्वतःचे अतिक्रमण काढू नका यासाठी गयावया करणारे,वाटा मागण्यासाठी ठेकेदारांमागे फिरणारे,गोहत्या करणाऱ्याना पाठीशी घालणारेच आज पत्रकार परिषदेत आरोप करीत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाऊस चालू असताना डांबरीकरण करत नसतात.पण कडक ऊन असेल तर करता येते.आता पत्रकार परिषद घेऊन टिका झाल्याने रस्त्यांची कामे करायला ठेकेदार धजणार नसल्याने जनतेलाच हाल सहन करावे लागणार.निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा कुटिल डाव असल्याचा आरोपही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close