सहकार
…या कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या ७२ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी आ.अशोक काळे व कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक मंडळ व पदाधिकारी.
महाराष्ट्रात गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांमध्ये मिल रोलर पूजन करण्याची मोठी परंपरा आहे.बॉयलर पूजन आणि रोलर पूजनानंतरच कारखान्यात प्रत्यक्ष ऊस गाळप प्रक्रियेला सुरुवात होते.कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनाने कारखान्याच्या ७२ व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झालेली आहे.येणाऱ्या गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून दरवर्षी करण्यात येणारे मिल रोलर पूजन संपन्न झाले असून संपूर्ण कारखान्याचे नूतनीकरणाचे काम मागील वर्षी पूर्ण झालेले आहेत.त्यामुळे अडचणी बहुतांश प्रमाणात कमी झाल्या आहेत.दरवर्षी प्रमाणे कारखान्याच्या यंत्र सामुग्रीचे देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.मिल रोलर पूजनाने कारखाना सुरु होण्याचा संदेश मिळतो.त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होवून अर्थकारणाला गती मिळण्याचा हा एक प्रकारचा संदेश असल्यामुळे कारखान्याच्या मिल रोलर पूजनाला विशेष महत्व आहे.तसेच गळीत हंगामाच्या दृष्टीने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरती अॅडव्हान्स वाटप सुरु करण्यात आले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक दिलीप बोरनारे,सूर्यभान कोळपे,सुधाकर रोहोम,राजेंद्र घुमरे,सचिन चांदगुडे,श्रीराम राजेभोसले,राहुल रोहमारे,शंकर चव्हाण,अनिल कदम,अशोक मवाळ,सुनील मांजरे,प्रशांत घुले,मनोज जगझाप,वसंत आभाळे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,दिनार कुदळे,श्रावण आसने,गंगाधर औताडे,सुरेश जाधव,विष्णू शिंदे,कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ, मुख्याभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायनतज्ञ सुर्यकांत ताकवणे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
दरम्यान चालू वर्षी मान्सूनवर एलनिनोचे सावट असल्यामुळे अर्धा जून महिना होवूनही पावसाचा कुठेही मागमूस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.संभाव्य पाणी टंचाई ओळखून शिल्लक पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी सुरु असलेल्या सिंचनाच्या आवर्तनाला स्थगिती देण्यात आली असून ऊस शेती धोक्यात आली आहे.जरी काहीशी चिंताजनक परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी जपून वापरावे.दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी अवाढव्य खर्च करू नये व पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये.शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.



