दळणवळण
….या तालुक्यातील नादुरुस्त पुलाचे काम सुरू !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील पुल नादुरुत झाला होता त्याचे कामासाठी आता निधी मंजूर झाला असून त्याच काम सुरू झाल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दरम्यान उत्तर भारतीयांना दक्षिण भारताला जोडणारा महत्वाचा रस्ता समजला जाणारा झगडेफाटा ते वडगाव पान हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करून तो सिमेंट मध्ये करण्याची मागणी जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांनी केली आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला व राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलावर काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे मागील काही महिन्यांपासून या महामार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.तत्पूर्वी अहिल्यानगर ते सावळीविहीर महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी धुळे-मालेगाव-मनमाड-येवला मार्गे कोपरगाव वरून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक पुणतांबा फाट्यावरून याच मुंबई-नागपूर महामार्गावरून वैजापूर मार्गे वळविण्यात आली होती.त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढली होती.परंतु या महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलावर पडलेल्या खड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे या पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे कोपरगाव वरून वैजापूर,छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या नागरीकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.

दरम्यान या अडचणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे वाहतूक बंद असल्यामुळे कोपरगाव-शिर्डी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या मांडून संवत्सर पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती.त्या मागणीची दखल घेवून केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री गडकरी यांनी या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते.त्या आदेशानुसार संवत्सर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून दुरूस्तीच काम पूर्ण होताच हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला होवून या पुलावरून पूर्वीप्रमाणे होणारी वाहतूक पुन्हा सुरळीत होणार आहे.त्यामुळे असंख्य वाहनचालकांना व नागरिकांना होणारा मोठा त्रास दूर होणार असल्याचे आ.काळे यांनी म्हटले आहे.दरम्यान संवत्सरच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु झाल्यामुळे या महामार्गाने नियमितपणे ये-जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये समाधान पसरले आहे.



