कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची ..हि बँक आर्थिक कामधेनू -माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर करण्यात व विकासात गौतम सहकारी बँकेची अहंम भूमिका असून ती आर्थिक कामधेनू असल्याचे प्रतिपादन बँकेचे मार्गदर्शक श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“गत आर्थिक वर्षात गौतम सहकारी बँकेच्या ठेवी १०० कोटीच्या पुढे असून ६३ कोटी ४९ लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना लघु व कुटीर उद्योग व्यवसाय शेती व शेती पूरक व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे माध्यमातून १७७ खातेदारांना १५ कोटी ३३ लाख ६३ हजार कर्ज वितरण करण्यात आले आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डी.
सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या गौतम सहकारी बँकेची २०२१-२२ या वर्षाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी बँकचे अध्यक्ष बाबासाहेब कोते होते.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,सचिन चांदगुडे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,शंकरराव चव्हाण,सुनील मांजरे, सुभाष आभाळे,माजी संचालक ज्ञानदेव मांजरे,अरुण चंद्रे,सोमनाथ घुमरे,बाबुराव कोल्हे, सोमनाथ कांगणे,नानासाहेब चौधरी,शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे,बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देशमुख,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड,कुक्कुट पालनचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,सचिव बाबा सय्यद,शरद पवार पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब काळे,गौतम सहकारी कुक्कुट पालनचे व्यवस्थापक सुरेश पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”नागरी सहकारी बँकांवर दुहेरी नियंत्रण असून एन.पी.ए.कालावधी, आयकराचा बोजा, सायबर क्राईम, सरकारी रोखे गुंतवणुकी मधील जोखीम, क्रेडीट व्यवस्थापन, तंत्रज्ञानावर होणारा, खर्च शेती मालाचे घसरते दर,त्याचा शेती उत्पन्नावर होणारा परिणाम होवून शेती व शेती पूरक व्यवसायाचे घटलेले उत्पन्न, जागतीक महामारी व विविध राष्ट्रातील युद्धसदृश्य परिस्थिती या सर्व बाबींमुळे मागील तीन वर्षात सहकार क्षेत्राला विविध बदलांना सामोरे जावे लागले आहे. २०२१/२२ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकासाठी काढलेले बोर्ड ऑफ मॅनेजमेंट रिस्क बेस इंटर्नल ऑडीट, प्रुडेशियल एक्सपोजर लिमिट, सिस्टम बेस अॅसेट क्लासिफिकेशन अशी काढण्यात आलेली परिपत्रके सध्याच्या बँक प्रणालीला वेगवेगळ्या वाटेवर घेवून जाणारी होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्ष हे निश्चितच आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीचा यशस्वी सामना करून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बँकेने आपली भूमिका सक्षमपणे बजावली हे अभिमानास्पद आहे.बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून हे प्रगतीची वाटचाल यापुढे देखील सातत्याने सुरु ठेवावी.बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनाने समन्वय ठेवून बँकेची आर्थिक प्रगती साधली त्याबद्दल पदाधिकारी व प्रशासनाचे आ.काळे यांनी कौतूक केले.
गौतम बँकेचे अ.नगर,नासिक,ठाणे, पुणे आणि औरंगाबाद शाखेत कार्यक्षेत्र असून नगर जिल्ह्यात सहा व नसिक जिल्ह्यात एक अशा बँकेच्या एकूण ७ शाखा सक्षमपणे सुरु आहेत.दि.३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षात गौतम सहकारी बँकेची गुंतवणूक ४७.१२ लाख असुन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२२ अखेर बँकेला २ कोटी ८७ लाख १३ हजार रुपये नफा झाला आहे.बँकेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. सभासदांना लाभांश देण्यास बँक सक्षम आहे परंतु रिझर्व बँकेने लाभांश जाहीर करणे वाटपावर बंदी घातल्यामुळे सभासदांना लाभांश देता येत नाही याची खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशासन अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार संचालक राजेंद्र ढोमसे यांनी मानले.