निधन वार्ता
उपमुख्यमंत्री पवार यांची बातमी मनाला वेदना देणारी-…संवेदना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तृत्ववान,समाजकारण आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.ही बातमी अत्यंत दुर्दैवी,मनाला वेदना देणारी आणि विश्वास बसणार नाही अशी असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी अवघ्या चोवीस तासांच्या आत येईल,अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.राजकीय पटलावरील अतिशय आवडते नेते,मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेले अजित पवार हे आता आपल्यात नाहीत,ही जाणीव अत्यंत वेदनादायी आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे कारखाना.
याबाबत त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,”आपण कालच दिनाक २७ जानेवारी रोजी,मंगळवारीच मुख्यमंत्री दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेतली होती.या भेटीत त्यांनी कारखान्यांपासून ते विविध विकासकामांपर्यंत अनेक विषयांवर अत्यंत आपुलकीने विचारपूस केली होती.कामातील शिस्त,स्पष्ट भूमिका आणि रोखठोक स्वभाव हीच त्यांची खरी ओळख होती.समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून निर्णय घेणारा,विकासासाठी झटणारा आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारा नेता म्हणून अजित पवार यांचे स्थान अतुलनीय होते.

“महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.ते आज आपल्यात नाही.याचे दुःख आहे.अभ्यासू दूरदृष्टी असणारे त्यांचे नेतृत्व होते.संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या जाण्याने दुःख झाले असून.सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकनेता आज हरपला आहे”-स्नेहलता कोल्हे,माजी आमदार कोपरगाव.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी अवघ्या चोवीस तासांच्या आत येईल,याची कल्पनाही कोणी केली नव्हती.राजकीय पटलावरील अतिशय आवडते नेते,मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेले अजित पवार हे आता आपल्यात नाहीत,ही जाणीव अत्यंत वेदनादायी असल्याची भावना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व पुढे लाभणार नाही,ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्राच्या या “दादांना” भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.त्यांच्या कार्याचा,विचारांचा आणि नेतृत्वाचा वारसा कायम प्रेरणादायी राहील.ईश्वराने दादांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो तसेच या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना,सहकाऱ्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला देवो अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.



