जलसंपदा विभाग
जलयात्रा ही परिवर्तनाची चळवळ ठरणार -…या नेत्याचे भाकीत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुरू केलेली जलयात्रा केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता, “पाणी हीच जीवनरेखा” या जाणिवेला समाजमनात दृढ करणारी परिवर्तनाची चळवळ ठरणार आहे.प्रत्येक नागरिकाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा,यासाठी ही जलयात्रा प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी या लोकाभिमुख शासक म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी गरीब,वंचित,शेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून कारभार केला.घाट धर्मशाळा,तीर्थक्षेत्र विकास,पाणी व्यवस्थापन,लघु सिंचन आणि समाज हिताच्या अनेक प्रभावी कामातून त्यांनी आदर्श सुशासन कसे असावे याचा आदर्श घालून दिला आहे”-आ.आशुतोष काळे, कोपरगाव.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही यात्रा गोदावरी (नाशिक/चोंडी) ते नर्मदा (महेश्वर,मध्य प्रदेश) या दरम्यानची सुमारे ८५० किलोमीटरची यात्रा आहे.या यात्रेत महाराष्ट्रातील ३० प्रमुख नद्यांच्या जलकलशांचे पूजन करून ते नाशिक येथे एकत्रित करण्यात आले आणि तिथून यात्रेची सुरुवात झाली असून गोदावरी आणि नर्मदा या पवित्र नद्यांना जोडणे आणि राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती रुजवणे हा या यात्रेचा उद्देश मानला जात आहे.या पार्श्वभूमीवर रविवार २६ एप्रिल रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव मतदार संघातील कुंभारी येथे दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या पाण्याचे विधिवत जल पूजन करून या पाण्याचा जल कुंभ पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदिप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान या जल यात्रेचे आगमन सोमवार सकाळी नऊ वाजता श्री साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे होणार असून ही यात्रा पुढे वैजापूर,गंगापूर,छत्रपती संभाजीनगर,खुलताबाद,घृष्णेश्वर,कन्नड,चाळीसगाव,धुळे,शिरपूरमार्गे मध्य प्रदेशातील महेश्वर येथे जाणार आहे.या ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेच्या स्वागतासाठी श्री साईबाबा कॉर्नर येथे राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
यावेळी राघवेश्वरनंदगिरी महाराज,गोदावरी पाटबंधारे कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता संदिप पाटील,स्व.नामदेवराव परजणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संभाजी काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे,प्रशांत घुले,विष्णु शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक नानासाहेब चौधरी,माजी उपसभापती वाल्मिक कोळपे,डॉ.आय.के.सय्यद,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पुण्यश्लोक अहिल्यादेवी या लोकाभिमुख शासक म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी गरीब,वंचित,शेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून कारभार केला.घाट धर्मशाळा,तीर्थक्षेत्र विकास,पाणी व्यवस्थापन,लघु सिंचन आणि समाज हिताच्या अनेक प्रभावी कामातून त्यांनी आदर्श सुशासन कसे असावे याचा आदर्श घालून दिला आहे.जनतेला दुष्काळाच्या झळा जाणवू नये यासाठी लघु कालव्यांचे जाळे उभारणे,पाणी साठवण आणि जलसंवर्धन,शेतीपूरक विकास हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणादायी असून ह्या प्रेरणेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन संकल्पना अत्यंत चांगली आहे.या ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी,लोकाभिमुख व शाश्वत होण्यास मदत होवून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली जलसंधारणची कामे त्या सोबतीला ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेमुळे महाराष्ट्र राज्य नक्कीच दुष्काळ मुक्तीवर मात करील व राज्यातील शेतकरी,जनता सुखी होईल असा आशावाद आ.काळे यांनी व्यक्त करून ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा हा विशेष राज्यव्यापी उपक्रम हाती घेतल्याबद्दल महायुती शासन व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.



