पुरस्कार,गौरव
स्व.पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या…या आमदारांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या सामाजिक,राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्य-कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात मोठे योगदान त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम केले आहे.त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देण्यात यावा.यासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

"स्व.अजित पवार यांचे सामाजिक व राजकीय योगदान केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते,तर संपूर्ण राज्यातील जनतेसाठी होते.त्यांनी आयुष्यभर समाज,माणूस आणि मूल्यांसाठी सातत्याने कार्य केले.त्यामुळे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा,यासाठी त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देण्याची मागणी नैतिकदृष्ट्या योग्य असून या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस स्वतः लक्ष घालणार आहेत"-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिनाक 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले आहे.त्यामुळे राज्यात शोककळा पसरली आहे.त्यातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.यातून कोपरगाव विधासनभेचे आ.आशुतोष काळे हे अजित पवार यांचे निष्ठावान समजले जात होते.त्यांनी याबाबत आपली ही मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कडे नुकतीच केली आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”राज्याच्या राजकारणात चार दशकाहून अधिक काम करणाऱ्या स्व.अजित पवार यांचे जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.कृषी,सहकार,शिक्षण,व्यापार,उद्योग अशा अनेक क्षेत्राची सखोल जाण असणाऱ्या स्व.अजीत पवार यांची जनतेशी नाळ जूळलेली होती.त्यामुळे ते केवळ राजकारणी नव्हते,तर एका संपूर्ण पिढीसाठी ते मार्गदर्शक होते.त्यांच्या शब्दात आत्मविश्वास होता आणि निर्णयांमध्ये लोकहिताची झलक होती.आज ते आपल्यात नसल्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी केवळ एका व्यक्तीची नसून,एका विचारधारेची,एका मूल्यव्यवस्थेची कमतरता आहे जी सहज भरून निघणार नाही.मात्र अभ्यासू दृष्टिकोन आणि जनतेच्या मनात अजरामर असलेल्या स्व.अजित पवार यांचे योगदान कदापि विसरता येणार नाही.त्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होऊन त्यांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी स्व.अजित पवार यांचे सन्मानार्थ त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार मिळावा यासाठी केद्र शासनाकडे शिफारस करावी अशी विनंती आ.काळे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटी केली आहे.



