जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…हे कारागृह बनले कोंडवाडा,आरोपींचा महिनोन्महिने मुक्काम !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तहसील कार्यालयात असलेल्या उपकारागृहात आरोपींची संख्या तब्बल ७८ वर पोहचली असून यातील २० आरोपी काल नाशिक येथील कारागृहात तर आज बिहार मधील चादर गँग मधील ०८ आरोपी आज छत्रपती संभाजीनगर येथे स्थानांतरित करण्यात आले असले तरी अजूनही या ठिकाणी ५० आरोपी शिल्लक असल्याने कोपरगाव येथील कारागृह हे आरोपींचा कोंडवाडा बनले असल्याचे मानले जात आहे.दरम्यान यात गंभीर गुन्ह्यातील काही आरोपी महिनोन्महिने याच ठिकाणी राहत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून यात मोठे अर्थकारण दडले असल्याचे विश्वसनीय वृत आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव येथील उपकारागृह अधिक्षक दत्तात्रय कोल्हाळ यांची भेट घेतली असता त्यानी या आरोपाचे खंडन केले आहे व आपण येण्यापूर्वी या ठिकाणी काय घडले हे माहिती नाही मात्र आपण या पदावर आल्यापासून तर असे काहीही घडले नसल्याचा दावा केला आहे.

   कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत जुने उपकारागृह असून यात ०५ बराकी आहे.यात आरोपीना ठेवण्याची क्षमता केवळ २५-३० आहे मात्र या ठिकाणी बऱ्याच वेळा गंभीर गुंह्यातील ६०-७० आरोपींना ठेवण्यात येते.दोन वर्षापूर्वी या ठिकाणी जवळपास एकूण ९० च्यावर आरोपी जेरबंद होते.त्यात कोपरगाव शहर,तालुका पोलीस ठाणे,शिर्डी,राहाता,लोणी,श्रीरामपूर आदी ठिकाणच्या भा.द.वि.खुनाचे कलम-३०२,खुनाचा प्रयत्न कलम-३०७,दरोडा कलम-३९५,बलात्कार-३७६ आदी गंभीर गुंह्यातील ३५ आरोपींचा समावेश होता.आज रोजी या ठिकाणी जवळपास ७८ आरोपी असून यातील काही गंभीर गुन्ह्यातील २० आरोपी काल नाशिक येथील कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे.तर आज सायंकाळी ०७ च्या सुमारास सचिन वॉच कंपनीत दरोडा घालणारे चादर गँग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहार मधील ०८ आरोपी स्थलांतरित करणेत आले आहे.तरीही आज रोजी या ठिकाणी ०५ बराकीत ५० आरोपी शिल्लक असल्याची माहिती कोपरगाव येथील उपकारागृह अधीक्षक दत्तात्रय गोल्हाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे हे उपकारागृह हे कारागृह न ठरता कोंडवाडा ठरला असून त्याची किंमत आरोपींना मोजावी लागतील असल्याचे वारंवार उघड झाले आहे.त्यामुळे अनेक आरोपी आजारी पडत असल्याचे या पूर्वी वारंवार उघड झाले आहे.

   बऱ्याच वेळा येथे आरोपीना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईक आणि त्यांच्या संबंधीत इसमाकडून भ्रमणध्वनी,गांजा,अफू व तत्सम विविध अवैध सेवासुविधा पूरविण्यात तेथील संबंधित अधिकारी आपला हात साफ करताना वेळोवेळी दिसून येत आहेत.आरोपींना भेटण्यास मोठी बिदागी नातेवाईकांना संबंधीत अधिकाऱ्यांना मोजावी लागते.याबाबत आमच्या प्रतिनिधीने वेळोवेळी हि बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे.मात्र त्यानंतरही त्यात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.पूर्वी या ठिकाणी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे रात्रीतून दोनदा भेट देऊन या गुन्हेगारीवर लक्ष ठेवत असत मात्र वर्तमानांत त्याची वानवा दिसत आहे.गत पंधरा दिवसापासून याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याची माहिती आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने शहर पोलिस ठाण्याचे वर्तमान पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

   दरम्यान या पूर्वी येथून सन-२००७ साली जवळपास सात आरोपी खिडकी तोडून फरार झाले होते हा इतिहास फार जुना नाही.त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मोठी यातायात करावी लागली होती.तर उपकारगृहात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शिर्डी विठ्ठलवाडी येथील आरोपी रोशन सोनवणे हा या कारागृहात असलेल्या आरोपीस अज्ञात कारणासाठी सुरा पूरवताना आढळून आला होता.मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या हि बाब वेळेवर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला होता.

दरम्यान यापूर्वी कोपरगाव कारागृहात येथील आरोपींना काही आक्षेपार्ह वस्तू पूरवतानाची माहिती मिळाल्याने चलचीत्रणाची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने मागितली असता संबधित पोलिस अधिकाऱ्यांनी ती सोयीस्कर रित्या टाळली होती.त्यामुळे या बाबत संशय वाढत असल्याचे दिसून येत आहे.



   दरम्यान काल नाशिक येथे २० आरोपी स्थलांतरित करण्यात आले असताना त्यातील शिर्डी येथील गंभीर गुन्ह्यातील एक आरोपी किडनी स्टोनच्या उपचाराच्या नावाखाली परत आणला गेला आहे.मात्र त्याची नोंद नाशिक येथे झाली का ? तेथे उपचाराची सोय नाही का ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान एका माहितीनुसार एक मोक्का मधील आरोपी वारंवार येथे मुक्काम ठोकून आहे.त्यावर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यास परत आणण्यात मोठे अर्थकारण दडले असल्याचे बोलले जात आहे.याबाबत येथील उपकारागृहाचा इतिहास फार चांगला नाही.हात ओले करणारा आरोपी या ठिकाणी महिनोनमहिने राहत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.वर्तमान स्थितीत असे १०-१२ आरोपी असे असल्याच्या बातम्या आहेत.त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले असल्याचे मानले जात आहे.अन्यथा काही अनर्थ घडू शकतो.

    दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव येथील उपकारागृह अधिक्षक दत्तात्रय कोल्हाळ यांची भेट घेतली असता त्यानी या आरोपाचे खंडन केले आहे व आपण येण्यापूर्वी या ठिकाणी काय घडले हे माहिती नाही मात्र आपण या पदावर आल्यापासून तर असे काहीही घडले नसल्याचा दावा केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close