कोपरगाव तालुका
वर्तमान मानवी जीवनात एकाग्रता महत्वाची-प्रतिपादन

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्यासाठी एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. हि एकाग्रता प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पवित्र वातावरणात आल्यावर मिळते त्याच बरोबर येथे आल्यावर आत्मिक समाधानाची अनुभूती देखील येते असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
परमेश्वराची आराधना केल्यानंतर प्रत्येक माणसाला मोठे समाधान मिळत असते.त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तो परमेश्वराची आराधना करून स्वतःच्या मनाला प्रफुल्लीत करुन नवीन उर्जा निर्माण करतो-आ.आशुतोष काळे
महाशिवरात्री निमित्त कोपरगाव शहरातील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहात्म्य कथा व झेंडावंदन आ.काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ब्रह्माकुमारी सरलादीदी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे,संदीप पगारे,अजीज शेख,मेहमूद सय्यद,डॉ. रामदास आव्हाड,वृंदाताई कोऱ्हाळकर,फकीर कुरेशी,अशोक आव्हाटे,मनोज कडू,जावेद शेख,चंद्रशेखर म्हस्के,वाल्मीक लहिरे,निखिल डांगे,योगेश नरोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की,”परमेश्वराची आराधना केल्यानंतर प्रत्येक मनुष्याला मोठे समाधान मिळत असते.त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण परमेश्वराची आराधना करून मनाला प्रफुल्लीत करतो.मन प्रफुल्लीत होवून एक वेगळी उर्जा निर्माण होते.प्रत्येकाला आपले दैनंदिन काम करण्यासाठी या उर्जेची मोठी मदत होत असते.हीच उर्जा प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पवित्र वातावरणात भरलेली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना बाधित रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळावे यासाठी कोविड केअर सेंटर सुरु केले आहे.मात्र वाढत असलेली बाधित रुग्णांची संख्या चिंता वाढविणारी आहे.त्यासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेवून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी केले आहे.