जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रोजगार हमी योजनेतून गावात विकास कामे करा-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामांना प्राधान्य देवून मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो व जलसंधारणाची कामे राबवून गाव दुष्काळमुक्त करता येऊ शकते.त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने मनरेगा योजनेची अंमलबजावणी करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका बैठकीत केले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत कामाचे स्वरुप हे अकुशल रोजगाराची पूर्तता,दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरुपी मालमत्ता तयार होईल अशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी करणे अभिप्रेत आहे.

मनरेगा योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी आ. काळे यांनी संपर्क नवी उमेद या संस्थेमार्फत ऑनलाईन विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात संस्थेच्या मेधा कुलकर्णी,प्रमोद झिंजाडे,एम.एन.कोंढाळकर,शरद अरगडे,मृणाली जोग यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली.या शिबिराच्या समारोप प्रसंगी या बैठकीसाठी सहभागी झालेल्या पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायतीचे सरपंच यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी शासनाने मनरेगा योजना सुरु केलेली आहे.या योजनेच्या सहाय्याने जलसंधारणची कामे करून आपली गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या संधी आहेत.त्या माध्यमातून ओढेनाले खोलीकरण,रुंदीकरण,मोठे साठवण तळे आदी कामे केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहजपणे मार्गी लागू शकतो.तसेच मजुरांना वेगवेगळ्या प्रकारची कामे देखील देता येवू शकतात. यामध्ये वृक्षलागवड,शाळा वालकंपाऊंड करणे,स्मशानभूमी शेड बांधणे तसेच फळबाग उभारणी,वृक्षलागवड व पशुपालनासाठी गोठे बांधणे अशा प्रकारचे अनेक कामे या मनरेगा योजनेच्या माध्यमातून बाराही महिने केली जाऊ शकतात.त्यामुळे एकीकडे रोजगार नसणाऱ्या मजुरांना १२ महिन्यासाठी रोजगार उपलब्ध होतो.त्यातून गावचा सर्वांगीण विकास साधता येईल.त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या गावात प्राधान्याने मनरेगा योजना राबवावी. या योजनेचे काम ऑनलाईन पद्धतीने असल्याने भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाही.आपले गाव खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी बालक व महिला व्यवस्था मजबूत करण्यासाठी समिती स्थापन करून त्या समितीवर स्वतंत्रपणे जबाबदारी टाकावी.महिला व बालक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करावी आदी सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. मनरेगा योजना राबवितांना ग्रामपंचायतींना अडचणी निर्माण झाल्यास या अडचणी दूर करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून माहिती घ्यावी व आपल्या गावात नियमितपणे हि मनरेगा योजना सुरु राहील यासाठी सर्व सरपंचांनी प्रयत्न करावे. ज्या सरपंचांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close