धार्मिक
…या शहरा नजीक गुरुपौर्णिमा तयारी अंतिम टप्प्यात !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी )
कोपरगाव शहरानजीक असलेल्या कोपरगाव बेट येथील काशी विश्वनाथ महादेव गोपालन ट्रस्टच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी गुरू पौर्णिमा उत्सव संपन्न होत असून या वर्षी त्या महोत्सवाची जोरदार तयारी संपन्न झाली असून त्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.ज्यांनी महाभारत,अठरा पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा,त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीत,अशी आपली श्रद्धा आहे.अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे.एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात.ज्या ग्रंथात धर्मशास्त्र,नीतिशास्त्र,व्यवहारशास्त्र,मानसशास्त्र आहे,असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात,त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याची प्रचिती कोपरगाव सह देशभरात येत आहे.कोपरगाव बेट येथे त्या निमित्ताने आषाढ शुद्ध \१५शके १९४६ रविवार दि.२१ जुलै रोजी संपन्न होत आहे.
दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवार दि.२० जुलै रोजी सायंकाळी ०८वाजता महंत रमेशगिरीजी महाराज व शिवभक्त भाऊ पाटील यांचे प्रवचन संपन्न होणार आहे.
दरम्यान या उत्सवासाठी स्वामी दत्तगिरीजी महाराज,स्वामी माधवगिरिजी महाराज,स्वामी रमेशगिरिजी महाराज आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि.२१ जुलै रोजी पहाटे चार वाजता बाबाजीच्या समाधीची पाद्यपूजा,सकाळी पाच वाजता नित्य नियम विधी,सकाळी सात वाजता सत्संग व प्रवचन,सकाळी नऊ वाजता बाबाजींच्या पादुकांची उत्सव मूर्तीची शोडपचारे पूजा विधी,सकाळी दहा वाजता साधुवृंदांची प्रवचने संपन्न होणार आहे.तर दुपारी बारा वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण होणार आहे.सायंकाळी साडेसात वाजता बाबाजीच्या पालखीची भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे.दरम्यान या पूजाविधी चे पौरोहित्य वेदशास्त्री प्रशांत शिखरे,अनंत शास्त्री,जयप्रकाश पांडे आदी करणार आहेत.
दरम्यान या कार्यक्रमासाठी कोपरगाव,राहता,श्रीरामपूर,संभाजीनगर आदी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर,उपाध्यक्ष विलास कोते व अन्य विश्वस्त आदींनी केले आहे.