आरोग्य
आता आत्मा मलिक मध्ये कोरोना बाधितांवर उपचार
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/08/IMG-20200810-WA0024-1-780x405.jpg)
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर मधील बेडची संख्या कमी पडत असल्यामुळे नव्याने निष्पन्न होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रशासनाकडून लायन्स मुकबधीर विद्यालयात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून येत्या काही दिवसात जर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली तर आत्मा मलिक वस्तीगृहात ३०० बेड तयार करून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातील असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच दिले आहे.
एक महिन्यापूर्वी कोरोना बाधित रूग्णांचा आकडा कमी असल्यामुळे काळजी कमी होती मात्र अनलॉक मुळे मागील काही दिवसांपासून वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे काळजी वाढली असून त्याचबरोबर जबाबदारी देखील वाढली आहे. आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा जरी ३५१ पर्यंत जावून पोहोचला असला तरी एस.एस.जी.एम.महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत १६१ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेवून पूर्णपणे बरे झाले आहेत-आ.काळे
कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्याचा उंच्चाक होवून दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आकडा हा ३५१ वर जावून पोहोचला आहे. वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध व्हावे यासाठी पर्यायी व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आ. काळे यांनी नुकतीच लायन्स मुकबधीर विद्यालयात कोरोना बाधित रुग्णांवर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती जाणून घेतली व पुढील संभाव्य धोका ओळखून करण्यात येणारी पूर्व तयारी म्हणून आत्मा मलिक वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रशासनाने आजपर्यंत कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या कामगिरीबाबत आ.काळे यांनी प्रशासनाचे विशेष कौतुक केले. या वेळी बोलतांना आ. काळे म्हणाले की,एक महिन्यापूर्वी कोरोना बाधित रूग्णांचा आकडा कमी असल्यामुळे काळजी कमी होती मात्र अनलॉक मुळे मागील काही दिवसांपासून वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे काळजी वाढली असून त्याचबरोबर जबाबदारी देखील वाढली आहे. आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा जरी ३५१ पर्यंत जावून पोहोचला असला तरी एस.एस.जी.एम.महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत १६१ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेवून पूर्णपणे बरे झाले आहेत व आज सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरु आहेत.
आज रोजी १७१ रुग्ण उपचार घेत असून दुर्दैवाने ४ कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असला तरी भविष्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाला आपला जीव गमवावा लागणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील त्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही.आज पर्यंतचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पाहता आज करण्यात आलेल्या ३४ रॅपिड टेस्ट मध्ये सुदैवाने कोरोना बाधित रुग्णांचा दुहेरी आकडा न येता केवळ ६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढली तरी त्यासाठी लायन्स मुकबधीर विद्यालय, आत्मा मलिक वसतिगृहात करण्यात येत असलेल्या ३०० बेडची व्यवस्था व आजपर्यंत प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या ठोस उपाय योजना व आज कोरोना बाधित रुग्णाचा आलेला एकेरी आकडा पाहता प्रशासन परिस्थिती नियंत्रनात ठेवील असा विश्वास आ.काळे यांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांची जबाबदारी आता वाढली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.घराबाहेर पडतांना नेहमी चेहऱ्याला मास्क लावावा व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय कोरोना साखळी तोडली जाणे केवळ अशक्य असून यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.