जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरंगावकरांना,” भीक नको,कुत्रे आवर” म्हणण्याची वेळ !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात कोरोनाचा कहर सुरु असल्याने नागरिकांना मृत्यूभयाने घरात बसण्याची प्रशासनाने सक्ती केली आहे.नगरपालिका आपले वेगवेगळया फवारण्यासह नियतकर्म वेळेत व सक्षमपणे करत असताना वर्तमानात कोपरगावातील काही आधुनिक वतनदारांनी कोणाचीही अधिकृत परवानगी न घेता शहरात विविध फवारण्याच्या नावाखाली कानाशी नौबती लावून ( स्पीकर) स्वतःचे ढोल बडवून घेण्याचे काम करून या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना घरात बसावे की नाही अशी दुर्दैवी वेळ आणली असून,”भीक नको कुत्रे आवर ” असे म्हणण्याचा अनास्था प्रसंग जनतेवर आणला आहे.या मुळे नागरिकांत अच्छीखांसी नाराजी पसरली आहे.व यांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा अशी मागणी केली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, “आपण कोपरगाव नगरपालिका प्रशासनास अशा फवारण्या करण्यास खाजगी संस्थांना परवानगी देऊ नका असे स्पष्ट बजावले होते.आणि जर तशी कोणी दिली असेल तर आपण ती त्वरित थांबवतो” असे आश्वासित केले आहे.

महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रस्ताची संख्या १७७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १७७ वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. “तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा” असं आवाहनही पंतप्रधानापासून मुख्यमंत्री व अनेकानी केले आहे.व घरात काय-काय करता येईल याचे सल्ले दिले आहेत.

या बाबत नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”पालिका नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास सक्षम असून ज्यावेळी नगरपालिका आपत्कालीन परिस्थितीत असेल त्यावेळी सक्षम यंत्रणेकडून नक्कीच मदत घेईल मात्र सध्या तरी तशी वेळ नाही.पालिका व आरोग्य विभाग आपले कर्तव्य पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे.व ते आमचे कर्तव्यच आहे व त्या मोबदल्यात पालिका नागरिकांकडून कर घेत असल्याची जाणीव करून दिली आहे.

एकवीस दिवस लोकांनी स्वतःला प्रशासनाच्या आदेशाने व स्वतःचा जीव वाचविण्याच्या भितिने का होईना घरात कोंडून घेतले आहे हे खरे आहे.पण तेथेही भ्रमणध्वनी,दूरदर्शनचे पडदे,इंटरनेट,फेसबुक,व्हाट्सअप, ट्विटर्स,आदी माध्यम संसाधने या माहितीने काठोकाठ भरून वाहत आहे.जिकडे तिकडे कोरोनाचा कहरच दिसून येत असून नागरिकांना येत असलेल्या सल्ल्यानी या विषयाचा तिटकारा आला असतानाही त्यांनी शासन आदेश हा आपला स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शिरसावंद्य मानला. (एरवी शासन आदेश हे पायदळी तुडविण्यासाठी असतात असा आमच्या देश वासीयांचा गोड समज ) मात्र हे सर्व शिगोशिग आलेले व सहनशीलतेची परिसीमा गाठणारे असताना त्यात अजून नव्याने कोपरगाव शहरात नव्याने भर पडली आहे.ती येथील राजकीय नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी व कोणाची परवानगी न घेता स्वतःच्या फवारणी रिक्षा शहरात फिरवून त्याला मोठमोठे भोंगे लावून गावात लोकांना जगणे नकोसे केले आहे.त्यांना सेवाच करायची तर स्वतःच्या प्रतिमेचे मंडन आणि कर्कश भोंगे कशासाठी ? असा साधा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.बरं या पूर्वीच्या यांच्या फवारण्यांचा लौकिक मनसेने उघड केलेला आहे.त्याला फार दिवसांचा कालखंड लोटलेला नाही

या बाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या कडे दोन अर्ज आलेले आहेत.मात्र तुंम्ही परवानगी दिली का ? यावर त्यांनी तोंडी “हो” म्हणालो असल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ अशी लेखी परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांना एवढी समाज सेवा करण्याची हौस होती तर गत सत्तर वर्षात पिण्याचे व शेतीचे पाणी,रोजगार,रस्ते हे या तालुक्याला देऊ का शकले नाही.कारखाने सभासदांनी स्वतःच्या खिशातून उभे करूनही त्यांचे नाव न घेता स्वतःचे प्रतिमा मंडन कशासाठी ? कारखाने यांनीच तोट्यात घातल्यावर कोट्यवधीचे पॅकेज मिळवताना नाव ऊस उत्पादक व सभासदांचे वापरायचे मात्र फवारणी करताना मात्र नाव व फोटो स्वतःचे वापरायचे हा कुठला न्याय ? याचा उलगडा नागरिकांना अद्याप तरी झालेला नाही.शेजारी गुजरात राज्यात उसाला प्रति टन ४ हजार ७०० रुपयांचा भाव आहे करा ना तालुक्यातील,कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची सेवा.महाविद्यालयात प्रवेश घेताना कारखाना सभासदाचे व तालुक्यातील नागरिकांचे डोनेशन कमी करा बरं. पण ती यांचेकडून होणार आहे का ? नाही.यांची समाजसेवा हि, “पावड्याने ओढायचे व चिमटीने वाटायचे” या प्रकारातील असल्याने हि खरी समाजसेवा समजायची का ? असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.अद्याप तरी तालुका व कोपरगाव शहर प्रशासन व शहर व तालुका पोलीस या पातळीवर कुठेही कमी पडल्याचे दिसत नाही.तरीही हि आगळीक तथा “चुबूकडूबुक” हे नेते कशासाठी करीत आहेत असा गंभीर प्रश्न जनतेपुढे उभा ठाकला आहे.

या बाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचेशी संपर्क साधला असता अशा भोंग्याची कोणालाही परवानगी दिली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी नगरपरिषदेच्या गत आठवड्यापासून दोन सोडियम हायपोक्लोराईड फवारणीचे ट्रॅक्टर सुरु असून दोन फोगिंगचे मशीन सुरु आहे हनुमाननगर,दत्तनगर, मोहिनीराजनगर,कोपरगाव बेट, जुने गावठाण,आदी भागात फवारणी मारून झाली आहे.सुभाषनगर,संजयनगर भागात सुरु आहे व खडकी,अंबिकानगर, साई धाम, उद्या पासून सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.तर आरोग्य निरीक्षक सुनील आरणे यांनी, मुख्याधिकरी प्रशांत सरोदे यांच्या उपस्थितीत “आज डॉ.आंबेडकर पुतळ्यापासून अग्नी बंबाने फवारणी सुरु केली असल्याचे सांगितले आहे.

या मागे अर्थातच “प्रसिद्धी लोलुपता” या खेरीज दुसरे कोणतेही कारण दिसत नाही हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.विशेष म्हणजे जवळ वर्ष सहा महिन्यावर आता एखादी निवडणूकही दिसत नाही.तरी हे उपद्व्याप का करतात हि मंडळी ? या नेत्यांचे हे प्रेम,मोले घातले रडाया,न आसू न माया”याच प्रकारातील आहे.पेशवाईतील पेंढाऱ्यासारखे सामान्य नागरिकांना वैतागून सोडले आहे.या मंडळींना शहरात केवळ निमित्त लागते की हि मंडळी एखाद्या ढोंगी गारुड्यासारखे आपले पेटारे उघडून संबळ्या मांडून तयारच आहे.याला काय म्हणावे असा प्रश्न तयार झाला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close