कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरात…या ठिकाणी उभारणार व्यापारी संकुल -आ.काळे

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस येवला नाक्या नजीकच्या जलसंपदा व महसूल विभागांच्या शासकीय जागेवर इमारतींचे निर्लेखन करून लवकरच आपण व्यापारी संकुल व लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीचा बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी आज सकाळी ११ वाजता एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहसेजारी शासकीय गोदाम जरी प्रस्तावित झाले असले तरी ही जागा महत्वपूर्ण असून महामार्गाशेजारी असल्याने याचे वाणिज्यिक कारणासाठी उपयोग होऊ शकतो.त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.त्या दिशेने आपण लवकरच प्रस्ताव करणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
नाबार्ड पायाभूत विकास योजनेअंतर्गत कोपरगाव येथे जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहसेजारी असलेल्या जागेत ०३ हजार टन क्षमतेचा व ३.५ कोटी रुपये खर्चाच्या शासकीय धान्य गोदाम इमारत बांधकाम करणे या कामाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान याच ठिकाणी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी एक कोटी रुपये खर्चाच्या बंदिस्त नाट्यगृहाची घोषणा केली होती आता त्यानंतर जवळपास ०८-०९ वर्षांनी
ती हवेत विरली असल्याचे या निमित्ताने अनेकांना आठवले आहे.या ठिकाणी आ.काळे यांनी घोषित केलेले व्यापारी संकुल व ज्येष्ठ नागरिकांचा बगीचा असाच हवेत न विरो अशी अपेक्षा विस्थापित टपरीधारकानी व्यक्त केली आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंद चव्हाण,तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव नगरपालिका माजी गटनेते वीरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाघचौरे,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे,आकाश डागा,राजेंद्र जोशी,नायक तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,प्रफुल्लिता सातपुते यांच्या प्रमुख उपस्थित सकाळी ११ वाजता संपन्न झाला आहे.याचे काम एक वर्षात पूर्ण करण्याचे आव्हान असून सदर काम प्रकाश गव्हाणे यांच्या संजस्व कन्स्ट्रक्शन संगमनेर यांनी घेतले आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सदर जागी शासकीय गोदाम जरी प्रस्तावित झाले असले तरी ही जागा महत्वपूर्ण असून महामार्गाशेजारी असल्याने याचे वाणिज्यिक कारणासाठी उपयोग होऊ शकतो.त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.त्या दिशेने आपण लवकरच प्रस्ताव करणार आहे.

दरम्यान या ठिकाणी असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासकीय विश्रामगृहासह अन्य इमारती पुन्हा एकदा नव्याने बांधण्यास प्राधान्यक्रम देणार असल्याची माहितीही आ.आशुतोष काळे यांनी शेवटी दिली आहे.