कोपरगाव तालुका
रेशन कार्डधारकांसाठी शिबिर आयोजीत करा-आ.काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांसाठी शिधापाण्यासाठीच्या तक्रारी कमी करण्यासाठी तहसीलदार व त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारी कमी करा असे आदेश कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांना दिले आहेत.
दिनांक १ फेब्रुवारी, २०१४ पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस पुर्वीप्रमाणेच प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.
कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व रेशन दुकानदार व पुरवठा विभागाची नुकतीच बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, अजीज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, राहुल जगधने आदी मान्यवरांसह, रेशन दुकानदार व पुरवठा विभागाचे अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजने अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डच्या (शिधापत्रिका) माध्यमातून अन्न-धान्य मिळाले पाहिजे. ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही अशा नागरिकांचा सर्वे करून त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करा. एकही लाभार्थी अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. तसेच शासकीय पातळीवर पुरवठा विभागाला येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवू असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.