दळणवळण
समृद्धी महामार्गाच्या उपरस्त्यांसाठी निधी मंजूर-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे खराब झालेल्या उप रस्त्यांचा (सेवा मार्ग) प्रश्न मार्गी लागला असून कोपरगाव तालुक्यातील जवळपास २६ किलोमीटर रस्त्यांसाठी महायुती शासनाने तब्बल ५२ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली असली तरी अद्याप नैसर्गिक जल प्रवाहासांठी मार्गिका काढण्यास सरकार तयार असल्याचे दिसत नाही.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी समजला जाणारा नागपूर-ते मुंबई हा समृद्धी महामार्ग या दोन शहरांचा प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी महत्वपूर्ण समजला जातो.तो कोपरगाव तालुक्यातून गेला असून या समृद्धी महामार्गाचे मागील वर्षी दोन टप्प्यात लोकार्पण होवून हा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला होता तर अद्याप एक शेवटचा टप्पा बाकी आहे.मात्र या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी सिन्नर तालुक्यातील सायाळे कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,कोकमठाण,धोत्रे,भोजडे,खोपडी,लौकी,कान्हेगाव,जेऊर कुंभारी,डाऊच,घारी,देर्डे,पोहेगाव आदी गावातील ज्या रस्त्यांचा वापर करण्यात आला होता.त्यापैकी अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते.मात्र नजीकच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मार्गच नव्हता.या प्रश्नी सर्व प्रथम सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील कार्यकर्ते डॉ.विजय शिंदे यांनी लक्ष वेधले होते.व त्यासाठी सायाळे हद्दीत सर्व प्रथम समृद्धी महामार्ग अडवला होता.त्यावेळी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सेवा मार्गाबाबत सर्व प्रथम आश्वासन दिले होते.अद्यापही या मार्गामुळे नैसर्गिक प्रवाह अडवले गेले असून त्यांना मार्ग काढून देण्याचे काम महामंडळाने केलेलं नाही.त्याकडे आ.काळे यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.कोपरगाव तालुक्यातही हीच स्थिती होती.
दरम्यान खराब उपरस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची आ.काळे यांनी दखल घेवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे प्रमुख अधिकारी,समृद्धी महामार्ग ठेकेदार व कार्यकर्त्यां समवेत रस्त्यांबाबत संवत्सर, कोकमठाण,धोत्रे,भोजडे,खोपडी,लौकी,कान्हेगाव,जेऊर कुंभारी,डाऊच,घारी,देर्डे,पोहेगाव आदी गावातील रस्त्यांची समक्ष पाहणी केली होती.नागरिकांना येत असलेल्या अडचणी सोडवून हे सर्व रस्ते पूर्ववत करून देण्याच्या त्यांनी सूचना केल्या होत्या.त्यावेळी बहुतांश रस्त्यांची दुरुस्ती झाली होती मात्र ज्या रस्त्यांची दुरुस्ती अद्याप बाकी होती त्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी निधी मिळावा याबाबत त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला असल्याचा दावा केला आहे.त्याची दखल महायुती शासनाने घेतली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या एकूण २६ किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार आहे त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.