नगर जिल्हा
आता स्वयं अध्ययनाद्वारे शिक्षण उपक्रम सुरू-ठुबे
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/06/IMG_20200613_065715-780x405.jpg)
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरेगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाद्वारे नगर जिल्ह्यात चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन व्यवसायमाला पुस्तकांद्वारे आता आश्रमशाळा विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी आमच्या प्रतिनिधींशी दिली आहे.
राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी १६ मार्च पासून घरी गेलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे प्रकल्प अधिकारी व काही ध्येयवेड्या शिक्षकांच्या संकल्पनेतून ताळेबंदीच्या काळात मुलांना स्वयंअध्ययन करता यावे यासाठी सारेगम शिक्षण प्रकल्प व शिक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसायपुस्तिका तयार करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या टाळेबंदीमुळे आदिवासी विकास विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना या पूर्वी शाळा स्तरावरील व्हॉट्सअॅप ग्रुप च्या माध्यमातून शिक्षण चालू होते.ते शिक्षण थांबू नये, शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद चालू राहावा,विद्यार्थी,शिक्षक संबंधातील तुटत जाणाऱ्या संपर्काला नवसंजीवनी मिळावी या हेतूने स्वयंअध्ययन पुस्तिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर पुस्तिकेत मराठी,इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आलेला असून दुसरी ते दहावी असे दोन वर्ग मिळून एक स्वयंअध्ययन पुस्तिका तयार करण्यात आलेली असून क्रमिक पुस्तकाशिवाय मुलांना स्वयंअध्ययन करता यावे हा या पुस्तकाचा हेतू आहे.आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणातील प्रमाण वाढत असताना टाळेबंदीच्या परिस्थितीत आश्रमशाळा मुलांची शिक्षणातून गळती होऊ नये व आदिवासी गाव पाड्यावरील शिक्षणाची चळवळ कोरोनामुळे थांबू नये म्हणून राजूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील २२ शासकीय आश्रमशाळेतील दुसरी ते दहावी या वर्गातील ४९१९ मुले मुली स्वयंअध्ययन पुस्तिकेद्वारे १ जून ते ३० ऑगष्ट अखेर शिक्षणाचे धडे गिरवत असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोहिदास साबळे यांनी दिली आहे.
कोरोना सारख्या महामारीत ग्रामीण भागांतील मुलांचे शिक्षण भ्रमणध्वनीद्वारे चालू होते.परंतु स्मार्टफोनची आदिवासी भागात सर्वांसाठी उपलब्धता शक्य नसल्याने स्वयंअध्ययन पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु या मार्गाने देखील विद्यार्थ्यांच्या मनाचा तळ गाठणे शक्य नसले तरी मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवणे शक्य होणार आहे.
राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी १६ मार्च पासून घरी गेलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे प्रकल्प अधिकारी व काही ध्येयवेड्या शिक्षकांच्या संकल्पनेतून ताळेबंदीच्या काळात मुलांना स्वयंअध्ययन करता यावे यासाठी सारेगम शिक्षण प्रकल्प व शिक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसायपुस्तिका तयार करण्यात आली आहे. सदर व्यवसायपुस्तिका नगर जिल्ह्यातील राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये आश्रमशाळा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी गाव पाड्यावरील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वितरीत केली असून शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे. सदर पुस्तकास आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भ्रमणध्वनीद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून प्रतिक्रिया जाणून घेत आहेत. तसेच आदिवासी समाजाच्या सामाजिक जाणीवेतून गरजवंत व नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या कुटुंबांना व गरजू विद्यार्थ्यांना टाळेबंदीच्या काळात मदत म्हणून प्रतीशिक्षक १००० रुपये या प्रमाणे राजूर प्रकल्पातील आश्रमशाळा शिक्षकांद्वारे प्रकल्पस्तरावर मदत निधी फंड उभा केला असून समाजिक उत्तरदायित्व म्हणून आश्रमशाळा कार्यक्षेत्रातील गरजवंतांना संसार उपयोगी साहित्य व अन्नधान्य-किरणा स्वरूपात मदत केली जात आहे. या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आदिवासी समाजातून कौतुक होत आहे.