दुष्काळ
…या तालुक्याचा जलयुक्त शिवार आराखडा सादर-…या नेत्याची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना अत्यंत उपयुक्त असून महायुती शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत कोपरगाव मतदार संघाचा ८.३४ कोटीचा जलयुक्त शिवार आराखडा शासन दरबारी सादर करण्यात आला असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“जलयुक्त शिवार अभियान-२ योजने अंतर्गत कृषी,जिल्हा परिषद,लघु पाटबंधारे,ग्रामपंचायत,जल संधारण,वन विभाग,सामाजिक वनीकरण आदी कामांचा समावेश आहे.या योजने अंतर्गत या २३ गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होवून पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
महाराष्ट्र जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात २०१६ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्व गावे दुष्काळमुक्त करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते.मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्याने ही योजना बंद पडली होती.मात्र आता पुन्हा जलयुक्त शिवार योजना (जे.एस.वाय.) सुरू करण्यात येत असून त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.या योजनेमुळे महाराष्ट्रातील ज्या भागात सर्वात जास्त दुष्काळ आहे त्यांना प्रथम पाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.या महाराष्ट्र जलयुक्त अभियान-२०२३ अंतर्गत दरवर्षी ०५ हजार गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
त्या निर्णयानुसार कोपरगाव मतदार संघात जलयुक्त शिवार अभियान-२ योजने अंतर्गत गाव निवडीच्या निकषानुसार मतदार संघातील २३ गावांचे गाव आराखडे व पाण्याचा ताळेबंदास नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये तालुकास्तरीय समितीची मान्यता देण्यात आली आहे.सदर गाव आराखडे तालुकास्तरीय समितीच्या मान्यतेने जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.एकूण २३ गावांच्या १३३६ कामांसाठी ८.३४ कोटीच्या कामांचा आराखडा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान गत दोन ते तीन वर्ष चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र चालू वर्षी पहिले तीन महिने अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यामुळे व ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला होता त्यात शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान होवून अडचणी वाढल्या होत्या.त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान- २ योजने अंतर्गत कृषी,जिल्हा परिषद,लघु पाटबंधारे,ग्रामपंचायत,जल संधारण,वन विभाग,सामाजिक वनीकरण आदी कामांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार अभियान -२ योजने अंतर्गत या २३ गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होवून पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.