कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावकरांचे ४२ कोटी कोनाच्या खिशात गेले-गंगुले यांचा सवाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या ४२ कोटीच्या पाणी योजनेत भ्रष्टाचाराला खतपाणी घातले नसते तर आज धरणात पाणी असून सुद्धा कोपरगावकरांवर सहा-आठ दिवसांनी पाणी देण्याची वेळ आली नसती.त्यामुळे कोपरगावकरांचे ४२ कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले हे शोधण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी माजी आ.कोल्हे यांना उद्देशून लिहिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“केंद्रातून आणलेल्या ४२ कोटीची पाणी योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात कशी अडकवली हे देखील कोपरगावच्या नागरिकांना सांगणे गरजेचे आहे.त्या ४२ कोटीच्या पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेसाठी टाकलेल्या पाईपलाईन सापडत नाही.या ४२ कोटीच्या पाणी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या योजनेच्या ठेकेदाराचा पिच्छा करून कोणते नगरसेवक ठेकेदाराकडून पैसे घेण्यासाठी थेट बँकेत जात होते हे शहर वासीयांना माहित आहे”-सुनील गंगूले,अध्यक्ष,कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस.
गंगूले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”मागील पाच वर्षात केंद्र व राज्यात आपल्या भाजप पक्षाचे सरकार असतांना देखील केवळ कोपरगावकरांना शक्य नसलेल्या गोष्टींचे स्वप्न दाखविण्यात माजी आ.कोल्हे यांचा कार्यकाळ आटोपला.सत्ता असतांना त्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करता आला नाही.४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी माजी आ.अशोक काळे यांनी २ कोटी निधी आणला होता.मात्र सत्ताधारी आमदार असतांना देखील आपल्याला श्रेय मिळणार नाही या भीतीपोटी आपल्या कुटील राजकारणापायी या २ कोटी निधीतून ४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीचे काम कोणी होवू दिले नाही हे देखील आपल्या मनाला विचारा.केंद्रातून आणलेल्या ४२ कोटीची पाणी योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात कशी गुरफटवली हे देखील कोपरगावच्या नागरिकांना सांगणे गरजेचे आहे. आजही त्या ४२ कोटीच्या पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेसाठी टाकलेल्या पाईपलाईन सापडत नाही.त्या पाईप लाईन गुप्त झाल्या आहेत का ? हे देखील सांगावे लागेल. या ४२ कोटीच्या पाणी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या योजनेच्या ठेकेदाराचा पिच्छा करून कोणते नगरसेवक ठेकेदाराकडून पैसे घेण्यासाठी थेट बँकेत जात होते हे कोपरगाव शहरातील नागरिकांनी पाहिलं आहे.त्यावेळी आपण विद्यमान लोकप्रतिनिधी असतांना आपण हे सर्व काही थांबवू शकत होता.जर त्यावेळी तुम्ही हि गोष्ट थांबविली असती तर हि ४२ कोटीची पाणी योजना निश्चितपणे चांगली झाली असती.वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर होवून कोपरगावकरांना उपलब्ध पाण्याचे व्यवस्थित नियोजन होवून नियमितपणे पाणी पुरवठा होवू शकला असता.त्यामुळे कोपरगावकरांवर हि वेळ कुणामुळे आली त्याचे प्रायश्चित २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील सुज्ञ मतदारांनी दिलेले आहे.
कोपरगावच्या नागरिकाना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे असताना देखील जाणून बुजून ५ नंबर साठवण तलावाला छुपा विरोध कोण करीत होते हे कोपरगावचे नागरिक जाणून आहेत.सन-२०१९ नंतर निवडून येताच दोनच महिन्यात आ.काळे यांनी ५ नं.साठवण तलावाचे काम सुरु करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून शहरातील जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.मात्र ज्याप्रमाणे ४२ कोटीच्या पाणी योजनेच्या भ्रष्टाचाराला मूक संमती दिली, ४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी आलेला निधी परत पाठविण्यात मोलाची भूमिका बजावली,त्याचीच पुनरावृत्ती सध्या सुरु असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत देखील होत आहे.त्यामुळे कोपरगावकरांवर नियमित पाणी पुरवठ्यापासून कोण वंचित ठेवू पाहत आहे असल्याचे निरीक्षण गंगूले यांनी नोंदवून आता तरी शुक्राचार्य बनण्याचे पातक करू नका असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना शेवटी केले आहे.