आंदोलन
निळवंडे धरणाचे पाणी अन्यत्र,दुष्काळी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडेचे पाणी लाभक्षेत्र सोडून अन्यत्र वर्ग केले जात असून निळवंडे कालव्यांचे दुसरे आवर्तनाला कोलदांडा घातला जात आहे व दुष्काळी शेतकऱ्यांचा पाण्याचा घास हिसकावून घेतला जात असून यावर जलसंपदा विभाग व जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय न घेतल्यास दुष्काळी भागातील शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा गंभीर ईशारा निळवंडे कालवा कृती समितीचे युवा कार्यकर्ते सौरभ शेळके यांनी एका प्रसिद्धी पत्रकांनव्ये दिला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटत आली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.५ हजार १७७.३८ कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचा इशारा दि.१८ जानेवारी २०२३ रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जयराम जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) दिला होता.त्यानंतर १३ जुलैला आर्थिक अधिकार गोठवले होते.त्यानंतर कालव्यांचे काम जलसंपदा विभागाला डावा कालवा मार्च २०२३ अखेर तर उजवा कालवा हा जून २०२३ अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले होते.तसे प्रतिज्ञापत्रच केंद्र व राज्य सरकारने उच्च न्यायालयासमोर दिले होते.हा प्रकल्प पूर्ण व्हावा हि राजकीय नेत्यांची अद्याप मानसिकताच दिसत नाही त्यांनी यासाठी विविध क्लुप्त्या लढविण्याचे व प्रकल्प अर्धवट ठेवण्यासाठी काम अद्याप सुरूच ठेवले आहे.त्याचे ताजे उदाहरण हे या भंडारदरा व निळवंडेतून प्रत्येकी दिड टि.एम.सी.असे एकूण तीन टि.एम.सी पाणी जायकवाडीत वर्ग करणे गरजेचे असताना पूर्ण तीन तीन.टि.एम.सी.पाणी निळवंडेतून वर्ग करून दुष्काळी शेतकऱ्यांवर अन्याय केला असून यांचे ‘पुतना मावशी’चे प्रेम उघड झाले असल्याचा आरोप केला आहे.उर्वरित पाणी त्यांनी जाणीवपूर्वक दि.२८ एप्रिल २०२४ रोजी प्रवरा नदीत सोडून दिले आहे.व दुष्काळी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे.वर्तमान खासदार सदाशिव लोखंडे ‘मौनीबाबा’ बनले असून ते लोकसभा निवडणुकीआधी प्रवरा खोऱ्याचे बाहुले बनले आहे.निळवंडेचे हक्काचे पाणी दुष्काळी शेतकऱ्यांना मिळू न देण्यात स्थानिक नेत्यांची खोड अद्यापही गेलेली नाही.व जलपूजनाचे वेळी ‘जलनायक’ म्हणून मिरवणारे खरे खलनायक पुन्हा एकदा उघड झाले आहे.आजही हि मंडळी निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी जनतेला उपाशी मारण्याचे काम मनोभावे करत आहे.या मुळे संतप्त निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व या प्रश्नी तातडीने एक बैठक आयोजीत करून जलसंपदा विभागाचे ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन आपल्या मागण्या केल्या आहेत.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे,गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,सचिव कैलास गव्हाणे,निळवंडे समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे,नानासाहेब रहाणे,एम.डी.घोरपडे,मच्छीन्द्र विष्णू काळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी समितीने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या सूचनेनुसार प्रवरा काठचा बनावट टंचाई अहवाल तातडीने रद्द करावा अशी मागणी करून खरी गरज असललेल्या निळवंडे डाव्या कालव्यात दुसरे आवर्तन,उजव्या कालव्यांत शिल्लक असलेले आवर्तन विनाविलंब सोडावे,अकोले तालुक्यातील निविदा काढलेले कि.मी.० ते २८ मधील अस्तरीकरण तातडीने सुरु करावे,कालव्यावरील निविदा काढलेल्या ‘एस्केप’चे काम तातडीने पूर्ण करावे,भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात सन-२००८ पासून वर्ग करण्यात येत असलेले निळवंडेचे पाणी निळवंडेचे कालवे पूर्ण झाल्याने तातडीने व कायमस्वरूपी थांबवावे,निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात दुष्काळी गावांचे पिण्याचे बिगरसिंचन पाणी आरक्षण तातडीने विनाविलंब टाकावे,अकोले तालुक्यातील पहिल्या आवर्तनात झालेली व उत्तरेतील नेत्यांच्या सुचनेंनुसार संगमनेर प्रांताधिकारी यांनी जाणीवपूर्वक रोखून धरलेली नुकसान भरपाई तातडीने द्यावी आदी प्रमुख मागण्या केल्या आहेत.या पूर्ण न केल्यास दुष्काळी शेतकरी कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागावर राहील असा शेवटी इशारा सौरभ शेळके यांनी दिला आहे.