दळणवळण
…या रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १९१ कोटी निधीतून सुरु असलेले काम खूपच धीम्या गतीने सुरु असून प्रवाशी आणि वाहन धरकांचे मोठे हाल होत असल्याने सदर मार्ग तातडीने पूर्ण व्हावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी बुधवार दि.०४ डिसेंबर रोजी दिल्ली येथे येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून केली आहे.

नगर-मनमाड रस्त्याचा पुढील भाग असलेला सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून याकडे आता निवडून आल्यावर आ.आशुतोष काळे यांनी लक्ष वेधून घेतले असल्याचे दिसून येत असून त्यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसात नगर-मनमाड महामार्गाची दुरूस्ती करण्यात येईल.याची जबाबदारी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्यावर सोपवण्यात आली होती.हे दुरूस्तीचे काम १५ सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ऑगस्ट महिन्यात विधानसभा निवडणुकीआधी मतांवर डोळा ठेवून दिले होते.त्यानंतर आता जवळपास चार महिने उलटत आले असताना त्यात कवडीची सुधारणा झालेली नाही.नगर-मनमाड महामार्गाची दयनीय स्थिती उत्तरोत्तर अत्यंत दयनीय होत आहे.रस्त्यावर पाणी मारण्यास वापर करण्यात येत असलेल्या बारदाना खतात रुपांतरीत झाला असला तरी त्याचा वापर राजरोस सुरू आहे.त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.गत पंचवीस वर्षात या जिल्ह्यात वर्तमान मंत्री आणि त्यांचे सहकारी सत्तेत असताना त्यांना या रस्त्यावरील खड्डे साधे बुजवता येत नाही ही मोठी शोकांतिका आणि त्यांचा हा राज्यात विशेष पराक्रम मानला जात आहे.त्याला सावळीविहीर ते कोपरगाव हा रस्ता अपवाद नाही.या महामार्गास केंद्र सरकारने १९१ कोटी रुपयांची तरतूद केली मात्र ठेकेदार वेगाने काम करण्यास तयार नाही या मागील कारण काय हे समजण्यास तयार नाही.या रस्त्यावर धूळ जास्त असून दुचाकीस्वारांना या मार्गाने जायचे म्हणजे अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.अपघातांची तर गणतीच नको.मात्र आता निवडून आल्यावर आ.आशुतोष काळे यांनी हा प्रश्न मनावर घेतला असल्याचे दिसून येत असून त्यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे.त्याबाबत त्यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने एक प्रसिध्दी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”
सावळीविहीर फाटा,कोपरगाव,मनमाड ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर,शिर्डी,अहिल्यानगर,दौंड,बारामती,पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आलेला आहे.७५२ जी च्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल १९१ कोटी निधी मिळवून दीड वर्षापूर्वी काम सुरू केले होते.परंतु सदर काम अतिशय धीम्या गतीने सुरु असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून छोटे अपघात देखील घडत आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
याबाबत आ.आशुतोष काळे यांनी संसद भवन दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेवून धीम्या गतीने रस्त्याचे सुरु असलेले काम व त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाची कैफियत त्याच्यापुढे मांडून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेवून त्यांना आवश्यक सूचना देवून रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी सहकार्य करावे अशा आशयाचे लेखी निवेदन दिले आहे.याबाबत गडकरी यांनी कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.