धार्मिक
परमार्थ धन देवापर्यंत घेऊन जाते-महंत उद्धव महाराज

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“परमार्थ हे महाधन आहे,परमार्थ धन देवापर्यंत घेऊन जाते म्हणून मनुष्य जीवनात परमार्थ फार महत्त्वाचा आहे,ज्या घरात परमार्थ धन आहे तेथे मिळवलेले धन टिकते,म्हणून संतांनी जे दिले ते अति श्रेष्ठ आहे.संत महात्मे हे समाजाला देण्यासाठी येत असतात” असे प्रतिपादन नेवासेचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथे बोलताना केले आहे.
“अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजावर संतांचे उपकार आहेत महात्म्यांनी समाजाला जागविले आणि जगविले असून हे कार्य आगामी काळात हि सुरूच राहील”-महंत उद्धव महाराज.
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र हिंगणी येथे वै.जोग महाराज पुण्यतिथी उत्सव व योगीराज तुकाराम बाबा यांची पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव निमित्ताने सुरू असलेल्या तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे दि ०२ फेब्रुवारी ची चौथे दिवसाची कीर्तन सेवा रुजू केली त्याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजावर संतांचे उपकार आहेत महात्म्यांनी समाजाला जागविले आणि जगविले असल्याचे सांगून “इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी” या माऊलींच्या उक्तीप्रमाणे महात्म्यांनी चालू केलेले कार्य अविरत चालू आहे हा ज्ञानाचा भक्तीच्या प्रेमाचा वर्षाव त्यांनी केला ही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती आहे.गायनाचार्य मनोहर महाराज कोठेकर व विठ्ठल महाराज सुलदलीकर तर मृदुंग वादक मंगेश महाराज जाधव यांनी उत्तम साथ दिली आहे.
माघ शुद्ध नवमी ३० जानेवारी २०२३ रोजी रघुनाथ महाराज खटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवार ०६ फेब्रुवारी रोजी ह भ प उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे किर्तनाने होणार आहे.
दररोज सकाळी ८ ते ११ गाथा पारायण,सायंकाळी ०५ ते ०६ हरिपाठ व ०७ ते ०९ हरिकीर्तन याप्रमाणे कार्यक्रम होत आहेत.गाथा पारायण सोहळ्यासाठी ४०० भाविक बसलेले असून दररोज सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण व संध्याकाळचा महाप्रसाद याप्रमाणे अतिशय नियोजनबद्ध रीतीने कार्यक्रम चालू आहे.सदर प्रसंगी किर्तन समाप्तीनंतर ३ हजाराच्या वर उपस्थित असलेल्या महीला व पुरुष भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.