कृषी विभाग
युरियाचा तातडीने पुरवठा करा-… या नेत्याच्या सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान हंगामात पुरेसा पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमदार असली तरी रब्बी पिकांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारे युरिया खत शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात युरियाचा तातडीने पुरवठा करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.

“कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खत मिळत नसल्याने त्याचा पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू शकते. ही बाब गंभीर असून त्याबाबत प्रशासनाने तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे” -आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यात युरिया खताचा तुटवडा सध्या तीव्र स्वरूपात जाणवत असून,हा तुटवडा नैसर्गिक आहे की कृत्रिम निर्माण केला जात आहे,असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.कृषी विभागाच्या ऑनलाइन ब्लॉक प्रणालीवर तालुक्यात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध असल्याची नोंद असतानाही प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने मोठी हेळसांड सुरू असून,याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी ही पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की,”रब्बी हंगाम सुरु असतांना कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खताचा गंभीर तुटवडा जाणवत आहे.शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले युरिया खत सेवा सहकारी संस्था व कृषी सेवा केंद्रांमध्ये शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर्षी रब्बी पिकांसाठी वातावरण अतिशय चांगले व पोषक असून ऊस,गहू,मका,कांदा आदी पिके जोमात असले तरी पिक वाढीसाठी युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खत मिळत नसल्याने त्याचा पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू शकते. ही बाब गंभीर असून त्याबाबत प्रशासनाने तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.बदलत्या हवामानाला तोंड देत शेतकरी शेती व्यवसाय करीत असतांना ऐन रब्बी हंगामात ऊस,गहू,मका,कांदा या पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.युरियाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तालुकानिहाय मागणीचा आढावा घेवून आवश्यकतेनुसार अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावा.शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घेवून शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोपरगाव तालुक्यात नियमित युरिया खताचा पुरवठा करा अशा सूचना आ.यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना शेवटी दिल्या आहेत.



