गुन्हे विषयक
ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या,चिठ्ठी लिहिल्याची चर्चा !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथून बदली होऊन मायगाव देवी येथे हजर न होणारे ग्रामपंचायत अधिकारी बाजीराव आर.बाचकर (वय-४८) यांनी आज पहाटे ०३ वाजेच्या सुमारास आपल्या नेवासा तालुक्यातील करजगाव येथील राहत्या घरी अज्ञात कारणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे.त्यामुळे नेवासा,कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,भाऊ,एक मुलगी,एक मुलगा असा मोठा परिवार असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान मयत बाजीराव बाचकर त्यांनी आपली आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या काही सहकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे.त्याआधी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे ? कोणावर आरोप केले आहे ? हे समजू शकले नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मयत ग्रामपंचायत अधिकारी बाजीराव बाचकर यांनी आधी नेवासा तालुक्यात २००५ साली आपल्या सेवेचा प्रारंभ केला होता.त्यानंतर त्यांनी काकडी विमानतळ येथील ग्रामपंचायतमध्ये जवळपास तीन वर्षे काम केले होते.त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांची कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे बदली झाली होती.तेथेही त्यांनी ०३ वर्षे काम असे एकूण २० वर्षे काम केले होते.मात्र काकडीसह अंजनापूर या दोन्ही ठिकाणी त्यांचे समाधानकारक काम नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या.त्यामुळे त्यांच्यावर कामातील अनियमितता आढळल्याने त्यांच्यावर प्रशासकीय पातळीवर चौकशीचा ससेमिरा सुरू असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान त्यांचा नुकत्याच बदल्या झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यात समावेश होता.त्यांची बदली मायगाव देवी ग्रामपंचायत या गोदावरी काठच्या ठिकाणी झाली होती.मात्र बदलीनंतर हे त्याजागी हजर झाले नव्हते अशी माहिती हाती आली आहे.बदलीच्या जागी हजर होण्याऐवजी त्यांनी दिनाक १७ जुलै २०२५ पासून रजा टाकली होती.व त्यानंतर ते आपल्या मूळगावी करजगाव या ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान आज पहाटे ०३ बाजेच्या सुमारास त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांच्यावर आज सायंकाळी ०५.१५ वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत अधिकारी,नातेवाईक उपस्थित होते.
दरम्यान त्यांनी आपली आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या काही सहकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे.त्याआधी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे ? कोणावर आरोप केले आहे ? हे समजू शकले नाही.मात्र शोकसभेत त्यांना प्रशासनाचा त्रास असल्याचे बोल ऐकू आले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.