गुन्हे विषयक
चोऱ्यांच्या उच्छाद करणारे चोरटे पकडले ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात चोरट्यांचा हैदोस सुरु असताना दोन दिवसांपूर्वी निवारा या उपनगरात अनेक चोऱ्या करणाऱ्या तीन जणांच्या टोळीस कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली असून त्यामुळे कार चोरीसह कोपरगाव शहरातील अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता वाढली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे.उन्हाळ्यात सह्याद्री कॉलनीत लेखा परीक्षक दत्ता खेमनर यांची स्विफ्ट डिझायर,निवारा परिसरात डॉ.जगदीश झंवर व साईनगर परिसरात अड्.मनोज कडू यांच्या दोन मारुती एर्टीगा या तीन किमती कार एकाच रात्री लंपास केल्या होत्या.या शिवाय निवारा परिसरात एक सुमारे दोन लाखांची चोरी झाली होती.या शिवाय कोपरगाव बस स्थानक व अन्य नागरिकांना रात्री व पहाटेच्या वेळी फिरण्याच्या मार्गावरील चैन ओरबडण्याच्या व सोन्याचे दागिने पळविण्याचा घटनांची गणतीच नव्हती.त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला का ? असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता.त्यामुळे या चोऱ्या वरचेवर वाढत चालल्या होत्या.याला आळा घालणे गरजेचे असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही.सर्वच आघाड्यावर सामसुम दिसत होती.तालुक्यातील झगडे फाटा येथे नागरिकांनी दोन संशयित दुचाकी चोरांना पकडले असल्याची समाधानकारक बातमी असली तरीं त्यातून किती दुचाकी परत मिळवल्या व अन्य किती गुन्हे उघड झाले आहे याची माहिती उपलब्ध झाली नाही व पोलिसांनी ती दिली नाही.
कोपरगाव तालुक्यात चोऱ्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच उघड झाली असून ती मोर्विस शिवारातील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात सुमारे ०३ लाख ११ हजारांची विविध कंपन्यांची परदेशी दारू चोरट्यानी हॉटेलचे शटरचे कुलूप तोडून लंपास केली होती.त्याचा गुन्हा दाखल होण्यास तब्बल दोन दिवस लागले असल्याची माहिती आहे.ते का लागले हा संशोधनाचा विषय आहे.अशातच एक गोड खबर आली असून चोरट्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांना यश आले असून त्यांनी एका टोळीस जेरबंद केले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.त्यांच्या कडून विविध गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.मात्र चोरट्यांची नावे उपलब्ध झाली नाही.