देश-विदेश
चीनच्या भारताविरोधात ताज्या कुरापती
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2022/07/images-2022-07-31T183111.708.jpeg)
न्यूजसेवा
विश्वसंचार
चीनचं विस्तारवादी धोरण लपून राहिलेलं नाही.भारताच्या सीमांवर अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारणं,शेजारच्या देशात गावं उभारणं आणि आता तर भूतान या भारताच्या मित्र देशाच्या सीमेवर गाव उभारणं यातून चीनचा भारताला शह देण्याचा प्रयत्न दिसतो.भूतानमध्ये वसवलेल्या गावाच्या आडून सुरू असलेल्या चीनच्या कुरापतीमुळे भारताची चिंता वाढली आहे.ही गंभीर चाल लक्षात घेऊन भारताला पावलं उचलावी लागणार आहेत.
भूतान आणि भारताच्या सीमेत सहज घुसखोरी करण्यासाठी डोकलाम पठार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.भारताचं ‘चिकन नेक’ समजल्या जाणार्या ‘सिलिगुडी कॉरिडॉर’वर हल्ला करून देशाला ईशान्य भारतापासून वेगळं करण्यासाठी चीनला डोकलाम पठार हवं आहे.हाच ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ ईशान्येकडील सर्व राज्यांना भारताशी जोडतो.चीन आणि भारतामध्ये २०१७ मध्ये झालेल्या डोकलाममधल्या धुमश्चक्रीत भारतीय जवानांनी बलिदान देत चिनी सैन्याला डोकलाममध्ये पाय ठेवण्यापासून रोखलं होतं.गलवानच्या लष्करी संघर्षानंतर चीन मूकपणे भारताचा बदला घेण्याच्या तयारीत आहे.
पाच वर्षांपूर्वी भारत आणि चीनदरम्यान डोकलाम परिसरावरून तणाव निर्माण झाला होता. ७२ दिवस चाललेल्या या संघर्षात भारताने विजय मिळवला.चीनने तात्पुरती माघार घेतली; परंतु त्यानंतरच्या दोनच वर्षांमध्ये चीनने डोकलाम परिसरात एक गाव वसवण्याचा निर्णय घेतला.दोन वर्षांपूर्वी त्या गावाचं संकल्पचित्र,नकाशे समोर आले.त्याच वेळी अरुणाचल प्रदेशातही चीनने भारताच्या हद्दीत घुसून गाव वसवायला सुरुवात केली होती.डोकलाम भागातल्या गावाचं काम आता पूर्ण झालं आहे.विस्तारवादाच्या विकृतीनं पछाडलेल्या चीनने भारत आणि भूतानच्या सीमेवरील कुरापती सुरूच ठेवल्या आहेत.इथल्या अमो चू खोर्यात संपूर्ण पूल,इमारतीसह चीनने गाव वसवलं आहे.या गावाला पंगडा असं नाव दिलं असून गावाच्या माध्यमातून सीमेवर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. भारताच्या संरक्षण खात्याच्या उपग्रहांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये चीन भूतान सीमेला लागून असलेल्या भागात गाव वसवत असल्याची छायाचित्रं प्रसिद्ध केली होती. आता हे गाव पूर्णपणे वसवलं गेलं असून ग्रामस्थांच्या घरासमोर गाड्या उभ्या असल्याची नवी छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत.
चीनने भूतानच्या जमिनीवर कब्जा करून पंगडाजवळच एक ‘ऑल वेदर रोड’ बांधला आहे.भूतानच्या सीमेच्या दहा किलोमीटर आत घुसखोरी करून हा रोड उभारला आहे.चीन अमो चू खोर्यात गावं आणि रस्तेबांधणीची कामं करत आहे.विशेष म्हणजे भूतानच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर आहे.पंगडा गाव आणि या गावासाठी आवश्यक असलेल्या सेवासुविधा पुरवण्याच्या नावाखाली सीमेजवळ पायाभूत सुविधा उभारण्याची चीनी रणनीती आहे.
भूतान आणि भारताच्या सीमेत सहज घुसखोरी करण्यासाठी डोकलाम पठार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.भारताचं ‘चिकन नेक’ समजल्या जाणार्या ‘सिलिगुडी कॉरिडॉर’वर हल्ला करून देशाला ईशान्य भारतापासून वेगळं करण्यासाठी चीनला डोकलाम पठार हवं आहे.हाच ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ ईशान्येकडील सर्व राज्यांना भारताशी जोडतो.चीन आणि भारतामध्ये २०१७ मध्ये झालेल्या डोकलाममधल्या धुमश्चक्रीत भारतीय जवानांनी बलिदान देत चिनी सैन्याला डोकलाममध्ये पाय ठेवण्यापासून रोखलं होतं.गलवानच्या लष्करी संघर्षानंतर चीन मूकपणे भारताचा बदला घेण्याच्या तयारीत आहे.सध्या संपूर्ण जगाचं लक्ष रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाकडे लागलं आहे आणि चीन आता शांत बसला आहे,असा विचार आपणही करू लागलो आहोत; पण सत्य हे आहे की चीन सतत भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असतो.भारताला वेढा घालण्यासाठी त्यांनी भूतानकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा विस्तार सुरू केला आहे.हा रस्ता वेगाने वाहणार्या अमो चू नदीच्या काठावर आहे.
चीनची जमिनीची भूक सतत वाढत आहे आणि आज भारताला काळजी करण्याची गरज आहे. कारण चीन हे गाव वसवण्याचा प्रयत्न करत असलेला भूतानचा भाग चीनच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.चीनने गेल्या वर्षी या भागावर कब्जा केला होता. त्यामुळे सिक्कीममधल्या भारतीय सुरक्षा दलांची चिंताही वाढली आहे.हा भाग भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तो चीनच्या ताब्यात गेला तर चीनच्या सैन्याला सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या डोकलाम पठारावर सहज पोहोचता येईल.याशिवाय भारताच्या संवेदनशील ‘सिलीगुडी कॉरिडॉर’मध्ये चीन सहज प्रवेश करू शकतो.‘सिलीगुडी कॉरिडॉर’ ईशान्येकडील राज्यांना देशाच्या इतर भागांशी जोडतो.यावरून ही बाब किती गंभीर आहे,हे लक्षात येतं. २०१७ मध्ये भारतीय लष्कराने चिनी सैन्याला डोकलाममधल्या झांपेरी रिजवर येण्यापासून रोखलं होतं; मात्र चीन आता पर्यायी मार्गाने इथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.मोठी गोष्ट म्हणजे चीन भूतानच्या भूमीचे तुकडे करत आहे आणि भूतानला ते थांबवता येत नाही,असं दिसतं.थोडक्यात,भूतानच्या काही भागात गावं,रस्ते आणि सुरक्षा प्रतिष्ठानं बांधून चीन भारताविरुद्ध आपली लष्करी क्षमता मजबूत करत आहे. भूतानच्या आघाडीवर ही घटना अशा वेळी घडली आहे,जेव्हा पूर्व आघाडीवर लडाखमध्ये तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या १६ फेर्या झाल्या आहेत; मात्र त्यानंतरही त्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही.
भारत आता पूर्व लडाखमध्ये संसाधनं वाढवत आहे.याआधी मे महिन्यात चीनने पूर्व लडाखमधल्या पँगॉंग सरोवरावर नवीन पुलाचं बांधकाम सुरू केल्याचं वृत्त आलं होतं. चिनी सैन्याची चिलखती वाहनं आणि ट्रक शस्त्रास्त्रं घेऊन सहज जाऊ शकतील हे लक्षात घेऊन हा पूल बांधण्यात आला आहे. म्हणजेच हा पूल आकाराने मोठा असून विशेषतः लष्कराच्या मदतीसाठी बांधला जात आहे. चीनने तिबेट सीमेजवळ ६२४ नवीन गावं वसवली आहेत आणि या गावांमध्ये चिनी सैन्याच्या चौक्याही बनवल्या जात आहेत. याशिवाय सीमेजवळ रुंद रस्ते बांधण्याचं कामही चीन वेगाने करत आहे. म्हणजेच दक्षिण चीन समुद्रात अवलंबलेली रणनीतीच चीन पूर्व लडाखमध्ये भारताविरुद्ध अवलंबत आहे.दक्षिण चीन समुद्रावरील दावा मजबूत करण्यासाठी चीनने तिथे कृत्रिम बेट विकसित केलं असून आपलं सैन्यही तैनात केलं आहे.चीनच्या या कारवायांवर भारतीय लष्कर आणि भारत सरकार बारीक लक्ष ठेवून आहे.त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सीमेजवळील आपल्या भागात रस्ते आणि पूल बांधत आहे.भारत सरकारने अलीकडेच सीमेजवळ ३२ नवीन रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला.त्यापैकी आठ रस्त्यांचं काम सुरू झालं आहे.
चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) अलीकडेच भारतीय सीमेजवळ असलेल्या शिंजियांग प्रदेशात ५,३०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर प्रगत ‘मल्टीपल लॉंच रॉकेट सिस्टीम’ (एमएलआरएस) ची चाचणी केली,जी भारतीय लष्करी आस्थापनांवर मारा करू शकते. चीनच्या ‘पीएलए’ने शिंजियांग लष्करी क्षेत्राच्या भारतीय सीमेजवळ असलेल्या प्रदेशात रॉकेट माइन-लेइंग वाहनाच्या नवीन प्रकारासाठी थेट-फायर प्रशिक्षण मूल्यांकन केलं आहे.हिमालयात चीन अनेक प्रक्षेपण रॉकेट प्रणाली तैनात करु शकतो.
एकीकडे सीमावादावर चर्चा करत असताना चीन भारताला वेढा घालण्यासाठी आपलं सैन्य आणि इतर साधनसामग्री का वापरत आहे,हा एक मोठा प्रश्न आहे.चीनला चार कारणांमुळे भारतासोबतचे संबंध सुरळीत करायचे नाहीत.त्याचं पहिलं कारण म्हणजे चीन भारतासोबतचा सीमावाद सोडवण्याच्या बाजूने नाही. चीनने पाकिस्तान आणि म्यानमारसारख्या देशांसोबतचा सीमावाद काही वर्षांपूर्वीच मिटवला होता;पण तो भारतासोबत असं करणार नाही.कारण तो भारताकडे प्रतिस्पर्धी देश म्हणून पाहतो.सीमावाद हा एकमेव मार्ग आहे,ज्याद्वारे चीन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो.दुसरं कारण चीन आपल्या विस्तार धोरणावर काम करत आहे. त्या अंतर्गत भारताच्या अखत्यारीत असलेल्या भागांवर तो आपला दावा कमकुवत करू इच्छित नाही.तिसरं कारण म्हणजे रस्ते आणि पूल बांधून आणि चीन सीमेवर गावं विकसित करून भारताला संरक्षणात्मक दृष्टीने अडचणीत आणू शकतो.चीन भारत सरकार आणि लष्करावर मानसिक दबाव टाकत आहे आणि चौथं आणि तितकचं महत्वाचं कारण म्हणजे चीन जगाला दाखवू इच्छितो की त्याचं सैन्य उंच आणि दुर्गम भागातही युद्धाला सक्षम आहे.तो खरं तर भारताच्या माध्यमातून अमेरिकेसारख्या देशांना उत्तर देत आहे.
चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) अलीकडेच भारतीय सीमेजवळ असलेल्या शिंजियांग प्रदेशात ५,३०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर प्रगत ‘मल्टीपल लॉंच रॉकेट सिस्टीम’ (एमएलआरएस) ची चाचणी केली,जी भारतीय लष्करी आस्थापनांवर मारा करू शकते. चीनच्या ‘पीएलए’ने शिंजियांग लष्करी क्षेत्राच्या भारतीय सीमेजवळ असलेल्या प्रदेशात रॉकेट माइन-लेइंग वाहनाच्या नवीन प्रकारासाठी थेट-फायर प्रशिक्षण मूल्यांकन केलं आहे.हिमालयात चीन अनेक प्रक्षेपण रॉकेट प्रणाली तैनात करु शकतो.चीनच्या ‘पीएलए’ने पँगॉंग लेकवर हल्ला करता येतो की नाही हे तपासण्यासाठी अलिकडेच हेलिकॉप्टरसह लष्करी सराव केला.चीनने आपल्या ‘स्पेस स्टेशन’साठी पहिलं ‘लॅब मॉड्यूल’ लॉंच केलं. फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्व प्रलंबित सीमा समस्यांचं निराकरण होईपर्यंत १३५ किलोमीटर लांबीच्या पँगॉंग तलावातून सैन्य मागे घेण्याचा करार भारत आणि चीनने केला; मात्र २०२० पासून ५० हजारांहून अधिक सैन्य अत्याधुनिक शस्त्रांसह फॉरवर्ड पोस्टवर तैनात केलं आहे. या सर्व तयारीवरुन आणि घेतलेल्या पावित्र्यावरुन चीनचे खरे मनसुबे लक्षात येतात.यातून भारताने नेमक्का बोध घेणं,ही काळाची गरज आहे.
– ले. ज. (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर
(अद्वैत फीचर्स)