शैक्षणिक
…या महाविद्यालयात विद्यार्थी परिसंवाद संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत नुकताच ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

"आपल्याला मिळालेल्या यश-अपयशाला जबाबदार आपणच असतो,आपण प्राप्त केलेले ज्ञान व आपल्या चांगल्या सवयी या वर्तमान आणि भविष्यात सतत कामाला येत असतात" - डॉ.विजय ठाणगे,प्राचार्य,के.जे.सोमैया महाविद्यालय, कोपरगाव.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत (QIP) ‘विद्यार्थी सहभाग परिसंवादा’चे आयोजन संलग्न महाविद्यालयांमध्ये केले जाते.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कोणत्याही भाषेत आपले विचार मांडण्याची संधी देणे आणि त्यांच्यामध्ये वक्तृत्व व विचारांची सुसंगत मांडणी कौशल्य विकसित करणे हा आहे,ज्यासाठी विद्यापीठ आर्थिक सहाय्य पुरवत असते.कोपरगावातील के.जे.सोमैया महाविद्यालयात त्यासाठी विद्यार्थ्यांचा परिसंवाद मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित या परिसंवादासाठी ‘शाश्वत विकास, युवती सुरक्षेमध्ये माझी भूमिका,विकसित भारत माझे स्वप्न-माझा आराखडा,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मी’ असे विषय ठेवण्यात आलेले होते.या परिसंवादात महाविद्यालयातील एकूण २६ संघांनी म्हणजेच १६२ विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता.या परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला आहे. मिळालेल्या यश-अपयशाला जबाबदार आपणच असतो,आपण प्राप्त केलेले ज्ञान व आपल्या चांगल्या सवयी ह्या सतत कामाला येत असतात असेही शेवटी सांगितले आहे.
सदर परिसंवादाचे प्रास्ताविक डॉ.निता शिंदे यांनी केले आहे त्यावेळी त्या म्हणाल्या की,”विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारावर विविध विषयावर त्यांचे विचार आणि कल्पना विस्तृतपणे मांडण्याचे कौशल्य या परिसंवादातून आत्मसात होणार आहे.या परिसंवादात विद्यार्थ्यानी निवडलेल्या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले असल्याचे दिसून आले आहे.
या परिसंवादात टी.वाय.बी.बी.सी.ए.(संघ- के )संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर द्वितीय क्रमांक एफ वाय बी.सी.एस.(संघ-जी) यांनी तर तृतीय क्रमांक एस.वाय. बी.सी.एस. (संघ -व्ही)संघाने पटकाविला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.ठाणगे यांनी दिली आहे.दरम्यान पुरस्कार प्राप्त संघाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
दरम्यान या संपूर्ण परिसंवादाचे परीक्षण नेहा गुरावे (सॉफ्ट स्किल ट्रेनर) राहाता यांनी केले होते.तर उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा.अमोल चिने व प्रा.आदिती देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.एम.बी.खोसे यांनी मानले आहे.या परिसंवादासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले आहे.



